Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

मी शिंदेंना पुन्हा भेटेन, काय चर्चा करायच्या त्या करा!:राज ठाकरेंचा भेटीवर संशय घेणाऱ्यांना टोला; निकोप राजकारण करण्याचा सल्ला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आपण मुंबईसह विविध शहरांतील समस्यांच्या मुद्यांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याचे स्पष्ट केले. आज निवडणुका संपल्या आहेत. आता एकनाथ शिंदे सत्तेत आहेत. त्यांना काही सूचना करायच्या असतील, चांगल्या गोष्टी करवून घ्यायच्या असतील तर त्यांना भेटू नये का? मी त्यांना पुन्हा भेटेन. तुम्हाला काय चर्चा करायच्या त्या करा, असे ते शिंदेंसोबतच्या भेटीत राजकारण शोधणाऱ्यांना टोला हाणताना म्हणालेत. राज ठाकरे यांनी गुरुवारी सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीविषयी राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या अटकळी व्यक्त केल्या जात आहेत. विशेषतः ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी राज यांच्यावर टीका केली होती. राज ठाकरे यांनी आज मनसेच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना या भेटीवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, आपल्याकडे आता पूर्वीसारखे निकोप राजकारण राहिले नाही. आज कुणी कुणाला भेटल्यानंतर त्यात युत्या, आघाड्याचे राजकारण शोधले जाते. आता 3 वर्षांनंतर निवडणुका आहेत. आता तर तशी परिस्थितीही नाही. आता निवडणुका संपल्यात. आज ते (शिंदे) सत्तेत आहेत. आम्हाला त्यांना काही सजेशन द्यायचे असतील, चांगल्या गोष्टी करून घ्यायच्या असतील, तर त्यांना भेटू नये का? प्रत्येकवेळी त्यात काहीतरी शोधलेच पाहिजे याची काहीच आवश्यकता नाही. उद्या मी मुख्यमंत्र्यांनाही भेटेन. आज मुंबई, पुणे, ठाणे आदी अनेक शहरांत अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांवर आम्हाला जे वाटते ते सांगणे गरजेचे नाही का? तुम्ही (पत्रकार) त्या दिवशी तिकडे असता तर तिथेच बोललो असतो. शहरांची अवस्था अत्यंत बिकट व भयावह राज ठाकरे पुढे म्हणाले, सध्या आपल्या शहरांची परिस्थिती अत्यंत बिकट व भयावह स्थितीत पोहोचली आहे. त्यातल्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे आपण पाहत नाही. आपल्याकडे रस्ते बांधणे, पूल व उड्डाणपुले बांधणे यालाच विकास म्हणतात. मला वाटते की, ही सूज आहे. त्याने अजून काही बाळसे धरले नाही. आपल्याकडे फ्लायओव्हर, पूल आदी सर्व गोष्टी चांगल्या व्हाव्यात. पण आपण मूळ गोष्टींना हात घालतच नाही. आज मुंबईसह सर्वच शहरांत सगळीकडे रिडेव्हलपमेंट सुरू आहेत. पूर्वी जिथे 40-50 माणसे राहत होती, तिथे आज 400 लोक राहत आहेत. जागा तेवढीच आहे. रस्तेही तेच आहेत. अशा सगळ्या परिस्थितीत आज अनेकांकडे अनेक गाड्या आहेत. त्या गाड्या आज पार्किंगमध्ये न जाता रस्त्यावर उभ्या राहत आहेत. या सगळ्या गोष्टींना कुठेतरी शिस्त आली पाहिजे. आज आरटीओकडे मोठ्या संख्येने गाड्या रजिस्टर होत आहेत. त्या गाड्या रस्त्यावर येत आहेत. यामुळे सगळीकडे जॅम होत आहेत. शहरात येणारी माणसे व गाड्या थांबत नाहीत. आपण हे प्रकरण कुठे नेणार आहोत? मागे मुख्यमंत्र्यांना भेटून मी हीच गोष्ट सांगितली होती. तीच गोष्ट मी आता त्यांच्या (शिंदे) कानावर घातली. त्यानंतर त्यांनी लगेच ती गोष्ट भूषण गगराणी यांना फोन करून सांगितली. आज गाड्या कुठेही पार्क असतात. तुमच्या ओला, उबेरवाल्यांना तर अक्कलच नसते. या सर्वांना जरब बसत नाही, तोपर्यंत शहरांना शिस्त लागणार नाही, असे ते म्हणाले. मी या सर्व गोष्टी त्यांच्या कानावर घातल्या. परंतु लोकांचा त्यावर विश्वास बसत नाही. ते उगीचच त्यात काहीतरी असणार म्हणून शंका घेतात. तुम्हाला काय चर्चा करायच्या त्या करत बसा. मी त्यांच्याकडे या गोष्टींसाठी गेलो होतो. मी त्यांना फाईल दिली आहे. ती त्यांनी गगराणीकडे पाठवली आहे. त्यावर पुढे काय होईल हे गगराणीला विचारा. आपल्याकडे कुंपणच शेत खातंय राज ठाकरे यांनी यावेळी बांगलादेशी घुसखोरांच्या मुद्यावरही आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, आपल्याकडे कुंपणच शेत खातंय. सगळ्या गोष्टींचा विचका झालाय. या सगळ्या लोकांना आधार कार्ड, रेशन कार्ड देणारे लोक इथलीच आहेत. त्यांच्यावर कारवाई कोण करणार. येणाऱ्या माणसांच्या हाती तुम्ही सगळ्या गोष्टी देत आहात. हे देणारी माणसे आपलीच आहेत. त्यांच्यावर कारवाई करा. एखाद्या शहरामध्ये किती माणसे येऊ शकतात, किती माणसे राहू शकतात त्याला काही आकार-उकार आहे की नाही. कुणी कधीही उठून कोणत्याही शहरात राहण्यासाठी जायचे असे होता कामा नये. या गोष्टींचा राज्य व केंद्राने विचार केला पाहिजे. आज आपण ज्यांच्याकडे चांगली शहरे म्हणून पाहतो, ती बरबाद होतील. होणारच आहेत. राज्याचा नागरीक, एका पक्षाचा अध्यक्ष व विरोधी पक्ष म्हणून काही गोष्टी सत्ताधाऱ्यांना सांगणे गरजेच्या होत्या. त्यासाठी मी त्यांना भेटलो. मी त्यांना पुन्हा भेटेन. त्यावर तुम्हाला राजकारणाच्या काय चर्चा करायच्या त्या करा. प्रत्येक गोष्टीकडे तिरस्काराने पाहण्याची गरज नाही महाराष्ट्रात पूर्वी एक निकोप राजकारण होते. निवडणुका संपल्यानंतर सर्वजण एकमेकांना भेटायचे. त्यात त्यांचे एकमेकांशी बोलणे व्हायचे. या सगळ्या गोष्टी आता बंद झाल्या आहेत. संपल्या आहेत. आता प्रत्येक गोष्टीकडे तिरस्कारानेच पाहिल्या जातात. हे असे चालणार नाही. त्यातून हाताला काही लागणार नाही. मला असे वाटते की, विरोधी पक्षांनी विरोधी पक्षाची भूमिका चांगल्या प्रकारे पार पाडली पाहिजे. जिथे सरकार चुकेल तिथे त्याला ठणकावले पाहिजे. उद्या आम्ही सरकारमध्ये असू. त्यामुळे आता सरकारमध्ये असलेल्यांनी उद्या हीच गोष्ट केली पाहिजे. या पद्धतीने राज्य चालले पाहिजे. तरच लोकांच्या हाताला काही लागेल, अन्यथा काहीच लागणार नाही. पत्रकारांनी यावेळी अजित पवारांच्या निधनाविषयी व्यक्त करण्यात येणाऱ्या शंकाकुशंकांविषयी राज ठाकरे यांना प्रश्न केला. पण त्यांनी त्यावर बोलण्यास नकार देत तेथून काढता पाय घेतला.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!