हवामान अंदाज:मान्सून 2-3 दिवसांत राज्यातील सर्व विभाग व्यापण्याची शक्यता, सध्या मान्सून कोकणातील हर्णे, बंगालच्या सिलीगुडीत थांबला

भारतात मान्सून दाखल झाल्यानंतर बुधवारी पहिल्यांदाच असे घडले की, त्याची गती दोन्ही टोकांवर (पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी) थांबली. मात्र, येत्या दोन ते तीन दिवसांत तो वेगाने पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. लवकरच मान्सून महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचा उर्वरित भाग व्यापेल. याशिवाय तो संपूर्ण तामिळनाडू व्यापत ओडिशा आणि छत्तीसगडपर्यंत पोहोचेल. मान्सूनचे पूर्व टोक पश्चिम बंगाल ओलांडून बिहार आणि झारखंडमध्येही धडक देईल. सध्या मान्सून चेन्नई, महाराष्ट्रातील हर्णे (कोकण) आणि बंगालच्या सिलीगुडीमध्ये थांबला आहे. मान्सून दाखल झाल्यापासून आतापर्यंत पावसात 25% तूट राहिली आहे. येत्या दोन-तीन दिवसांत ती भरून निघेल, अशी अपेक्षा आहे. मराठवाड्यात यलो अलर्ट महाराष्ट्रात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. गुरुवारी विदर्भातील काही भागांत पाऊस पडेल. मात्र, शुक्रवार आणि शनिवारी विदर्भातील अनेक जिल्ह्यांत पावसाची तीव्रता लक्षणीय वाढणार असून तेथे मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. मान्सून सध्या हर्णे, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूरपर्यंत पोहोचला आहे. येत्या तीन ते चार दिवसांत तो पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.

शेती उत्पादनावर परिणाम 2020-21 मध्ये परतीच्या पावसाने तर 2022 मध्ये जुलै-ऑगस्टच्या अतिवृष्टीने पिकांना फटका दिला. मात्र, रब्बी हंगामात हरभरा व गव्हाचे विक्रमी उत्पादन झाले. 2023 मध्ये ऑगस्टच्या प्रदीर्घ खंडामुळे सोयाबीन-कापसाचे उत्पादन 30 टक्क्यांपर्यंत घटले. 2024 मध्ये सुरुवातीच्या ओढीनंतर ऑगस्ट-सप्टेंबरमधील पावसाने खरीप वाचवले आणि भूजल पातळी वाढल्याने रब्बी हंगाम फायदेशीर ठरला. दिव्य मराठी इनसाइट नवी दिल्ली | हवामान बदल आणि अरबी समुद्राच्या वाढत्या तापमानामुळे भारतातील मान्सूनचे स्वरूप बदलले आहे. आता महिनोन् महिने पडणाऱ्या सामान्य पावसाऐवजी काही तासांतच विध्वंस घडवून आणणारा मुसळधार पाऊस आणि त्यानंतर प्रदीर्घ कोरडे हवामान पाहायला मिळत आहे. आयआयटी रुरकीच्या अभ्यासातही असे संकेत मिळाले आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!