Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

पश्चिम आशियात रणसंग्राम, भारताची भूमिका काय?:विश्वगुरू नरेंद्र मोदींनी शांततेसाठी पुढाकार घ्यावा; संजय राऊत यांची उपरोधक टीका

पश्चिम आशियात इराण आणि इस्रायल यांच्यात भीषण संघर्ष पेटला असून परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली आहे. शनिवारी, 28 फेब्रुवारी 2026 रोजी इस्रायलने अमेरिकेसोबत संयुक्त कारवाई करत इराणवर हल्ला चढवला. या कारवाईनंतर तेहरानने तात्काळ प्रत्युत्तर देत पश्चिम आशियातील अमेरिकेच्या हवाई तळांवर क्षेपणास्त्र डागले. दोन्ही बाजूंनी सुरू असलेल्या हवाई हल्ल्यांमुळे संपूर्ण प्रदेश अस्थिर झाला आहे. या संयुक्त कारवाईत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी ठार झाल्याची बातमी समोर आली असून त्यामुळे संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धात खामेनी आणि त्यांच्या कुटुंबीयांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. दोन दिवसांपूर्वी मोदी इस्रायल दौऱ्यावरून परतले आणि त्यानंतर लगेचच युद्ध भडकले, हा निव्वळ योगायोग असू शकत नाही, असा दावा राऊत यांनी केला. मोदींचे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी जवळचे संबंध असल्याचा उल्लेख त्यांनी केला. इराण हा भारताचा जुना मित्र देश होता, तसेच इस्रायलही भारताशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवतो, असे राऊत म्हणाले. काश्मीर प्रश्नावर इराणने भारताची बाजू घेतली होती. अत्यंत स्वस्त दरात इराण भारताला तेल पुरवत होता, याचीही त्यांनी आठवण करून दिली. अशा परिस्थितीत या युद्धात भारताने स्पष्ट भूमिका घेणे आवश्यक आहे. मोदी हे ट्रम्प आणि नेतन्याहू यांचे मित्र असल्याने त्यांनी युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते, असे मत त्यांनी व्यक्त केले. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी करण्यासाठी ट्रम्प पुढाकार घेऊ शकतात, तर मोदी हे इस्रायल, इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष थांबवू शकत नाहीत का, असा थेट सवाल राऊत यांनी उपस्थित केला. हे युद्ध अत्यंत धोकादायक वळणावर गेले असून त्याचे परिणाम दूरगामी असतील, असा इशाराही त्यांनी दिला. इराणवर अमेरिका आणि इस्रायल ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतील आणि त्यानंतर त्यांची पावले भारताकडे वळू शकतात, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. परराष्ट्र धोरणावर प्रश्नचिन्ह भारताने केलेल्या व्यापार करारांमुळे देश अमेरिकेच्या प्रभावाखाली गेला आहे, असा आरोपही राऊत यांनी केला. पाकिस्तानला शस्त्रसाठा पुरवण्याचे काम ट्रम्प करतात, असे म्हणत त्यांनी परराष्ट्र धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. परदेश दौऱ्यांवर जाऊन केवळ मिठ्या मारणे आणि छायाचित्रे पाठवणे एवढेच धोरण आहे का, असा उपरोधिक सवाल त्यांनी केला. इतके मोठे युद्ध सुरू असताना भारताने ठोस भूमिका मांडणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. स्पष्ट भूमिका घेऊन शांततेसाठी पुढाकार घ्यावा या संघर्षाचे चटके भारतालाही बसू शकतात. युद्ध भारताच्या उंबरठ्यापर्यंत येण्याची शक्यता असून भूगोल बदलण्याइतकी परिस्थिती गंभीर होऊ शकते, असे राऊत म्हणाले. पश्चिम आशियातील विमानतळांवर हल्ले झाले असून पर्यटक अडकून पडले आहेत. अशा वेळी भारतीय परराष्ट्र विभाग काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मोदींना विश्वगुरू म्हटले जाते, तर अशा जागतिक संकटात त्यांनी स्पष्ट भूमिका घेऊन शांततेसाठी पुढाकार घ्यावा, असे म्हणत राऊत यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!