तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या दहीहंडा गावात पाणीपुरवठा योजना फसली असून नागरिकांवर भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. भर उन्हाळ्यात ४५ अंश सेल्सिअस तापमानात महिला, लहान मुले, वृद्ध आणि सर्वसामान्य नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे, असे दहीहंडा विकास मंचाचे म्हणणे आहे. दहीहंडा गावाला ८४ खेडी पाणीपुरवठा योजनेतून पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष टंचाई ग्रस्तगाव योजनेतून पूर्णा नदी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली होती, असे दहीहंडा विकास मंचच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तब्बल १४ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. या योजनेतून गावातील प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचणे अपेक्षित होते. मात्र, निकृष्ट दर्जाची पाइपलाइन, बोअरवेल व अपूर्ण कामांमुळे पाणी गावात न पोहोचता थेट नाल्यात वाहून जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावर तातडीने उपाय योजना करण्याची मागणी दहीहंडा विकास मंचच्या वतीने प्रा. डॉ. विजय आठवले, किशोर सिरसाठ, संजय खाडे, दीपक भांडे, राहुल आठवले, शत्रुघ्न आठवले, राजू लाड, नीलेश जैन, अजय आठवले व अन्य नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात निवेदन सादर करण्यात आले असून प्रशासन नेमकी काय भूमिका घेतली याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे. एकीकडे लाखो रुपये खर्च करून पाणी नाल्यात वाहून जात असल्याचा आरोप दहीहंडा विकास मंचच्या वतीने होत असताना, दुसरीकडे गरीब शेतमजूर, शेतकरी व सामान्य कुटुंबांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. ४५ अंश सेल्सियस तापमानात महिलांची, वृद्धांची आणि लहान मुलांची पाण्यासाठी धावपळ होत आहे. गावातील अनेक भागांमध्ये टँकरसमोर पाणी भरण्यासाठी मोठी गर्दी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. टँकरद्वारे पाणी मिळत असताना पाण्यासाठी हाल होत आहेत, असे दहीहंडा विकास मंचच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. लाखो रुपये खर्च करूनही ग्रामस्थ टँकरवर अवलंबून; पाण्यासाठी होते मोठी गर्दी