Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला गेलो, राजकीय चर्चा नाही:शिंदे गटाच्या स्नेहभोजनावरून राजकारण तापलं; ठाकरेंच्या नेत्याचा खुलासा

शिवसेना शिंदे गटाच्या स्नेहभोजनानंतर निर्माण झालेल्या राजकीय चर्चांवर आता ठाकरे गटाच्या खासदारांनी स्पष्टीकरण दिलं आहे. नांदेडचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आम्ही केवळ शुभेच्छा देण्यासाठीच गेलो होतो, कोणत्याही राजकीय चर्चेसाठी नाही, असं स्पष्ट केलं आहे. या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात निर्माण झालेल्या खळबळीला उत्तर देताना त्यांनी ऑपरेशन टायगर, सारख्या चर्चांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं सांगितलं. केंद्रीय मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रतापराव जाधव यांनी आयोजित केलेल्या डिनर कार्यक्रमाला ठाकरे गटाचे दोन खासदार, नागेश आष्टीकर आणि संजय देशमुख हजर राहिले होते. या उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं. विशेषत: राज्यात ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चा रंगत असताना या भेटीला वेगळं महत्त्व प्राप्त झालं. त्यामुळे ही केवळ सामाजिक भेट की त्यामागे राजकीय संदेश आहे, याबाबत चर्चा सुरू झाली. मात्र नागेश आष्टीकर यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी सांगितलं की, प्रतापराव जाधव यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम होता आणि सभागृहातच त्यांनी निमंत्रण दिलं होतं. त्यामुळे आम्ही त्यांच्या घरी जाऊन 5 ते 10 मिनिटांत शुभेच्छा देऊन परतलो. याचा अर्थ कुठल्याही गुप्त बैठकीचा किंवा राजकीय हालचालींचा लावू नये, असं त्यांनी स्पष्ट केलं. एकाच सभागृहातील सदस्य असल्याने सुख-दु:खात भेटणं स्वाभाविक आहे, असंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान, काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपशी संबंधित मोहित कंबोज यांच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. त्या पार्श्वभूमीवर आष्टीकर यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी सांगितलं की, त्या भेटीचा आणि आमच्या उपस्थितीचा काहीही संबंध नाही. आदित्य ठाकरे हे आमचे नेते आहेत, आम्ही त्यांच्याच नेतृत्वात काम करतो. प्रतापराव जाधव यांच्या घरी जाणं ही फक्त सौजन्याची भेट होती, असं त्यांनी पुन्हा स्पष्ट केलं. ऑपरेशन टायगरच्या चर्चांना उधाण दरम्यान, या घटनेमुळे पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेना शिंदे गटाकडून ठाकरे गटाचे सहा आणि शरद पवार गटाचे सहा खासदार आपल्या बाजूला वळवण्याची रणनीती आखली असल्याची चर्चा आहे. सध्या शिंदे गटाकडे सात खासदार असून, ही संख्या 19 पर्यंत नेण्याचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे. मात्र या हालचालींना भाजपकडून अद्याप हिरवा कंदील मिळालेला नसल्याची माहिती सूत्रांकडून दिली जाते. त्यामुळे सध्या तरी या भेटीमुळे निर्माण झालेलं राजकीय वातावरण आणि चर्चांचा वेग कायम असला, तरी ठाकरे गटाने दिलेल्या स्पष्टीकरणामुळे या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!