आधुनिक युगात हरवत चाललेली परंपरा
सुरेश पाचभाई, मारेगाव
मारेगाव : एकेकाळी गावागावांत घराघरात धान्य दळण्याचा आवाज घुमायचा… सकाळच्या शांत वातावरणात फिरणाऱ्या दगडी जात्याचा आवाज म्हणजे ग्रामीण जीवनाचा अविभाज्य भाग होता. आज आधुनिक इलेक्ट्रिक गिरण्या आणि मशीनच्या युगात ही पारंपरिक आटाचक्की इतिहासाच्या पानांमध्ये हरवत चालली आहे. मात्र अजूनही काही ठिकाणी जुन्या काळाची साक्ष देणारी ही दगडी आटाचक्की पाहायला मिळते आणि ती पाहताच अनेकांच्या आठवणी जाग्या होतात.
पूर्वी महिलांचा दिवस या चक्कीभोवतीच सुरू व्हायचा. घरातील गहू, ज्वारी, बाजरी दळून कुटुंबासाठी भाकरीची तयारी केली जायची. या चक्कीशी फक्त अन्न नव्हे तर कष्ट, संस्कार आणि ग्रामीण जीवनाची परंपरा जोडलेली होती. गावातील लोक एकत्र बसून गप्पा मारत दळण करत असत. त्यामुळे ही चक्की सामाजिक एकोप्याचेही प्रतीक मानली जायची.

आजच्या तरुण पिढीला ही दगडी आटाचक्की फक्त फोटोमध्ये किंवा संग्रहालयात पाहायला मिळते. पण जुन्या पिढीसाठी ती त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, मेहनत आणि साधेपणाची जिवंत आठवण आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे काम सोपे झाले असले तरी त्या काळातील माणुसकी, जिव्हाळा आणि श्रमसंस्कृती मात्र हळूहळू लोप पावत असल्याची खंत ज्येष्ठ नागरिक व्यक्त करतात.
ग्रामीण संस्कृतीचा अमूल्य ठेवा असलेली ही पारंपरिक आटाचक्की जपण्याची गरज असून, येणाऱ्या पिढीला आपल्या इतिहासाची आणि कष्टमय जीवनशैलीची जाणीव करून देणे काळाची गरज असल्याचे मत ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
