प्रतिनिधी | ढोरकीन पैठण तालुक्यातील ववा, वडाळा, कासार पाडळीसह बालानगर परिसरातील शेतकऱ्यांवर पाण्याचे संकट ओढवले आहे. शेतीपंपासाठी वीजपुरवठा अनियमित आहे. वाढत्या उन्हामुळे जमिनीतील आर्द्रता झपाट्याने कमी होत आहे. पिकांना वेळेवर पाणी मिळत नाही. अनेक शेतातील पिकांची पाने पिवळी पडली आहेत. ती करपू लागली आहेत. शेतकरी संकटात सापडला आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या मते, मागील काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली आहे. कडक उन्हामुळे माती कोरडी पडत आहे. पिकांची वाढ थांबली आहे. नियमित पाण्याची गरज असलेली पिके अधिक धोक्यात आली आहेत. अनेक शेतांमध्ये पिकांची पाने पिवळी पडून करपू लागली आहेत. काही ठिकाणी पिके पूर्णपणे करपण्याच्या मार्गावर आहेत. शेती पंपांना वीज नियमित नसल्याने शेतकऱ्यांची शारीरिक व मानसिक दमछाक होत आहे. वेळेवर पाणी न मिळाल्यास संपूर्ण हंगामाचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. खेर्डा परिसरातील ११ केव्ही खेर्डा एजी फिडरवरील शेतीपंपांचा विजभार वाढला आहे. त्यामुळे सध्या एक दिवसाआड वीजपुरवठा केला जात आहे. परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नियमित वीजपुरवठा न मिळाल्याने पिकांना वेळेवर पाणी देता येत नाही. वाढत्या उन्हामुळे परिस्थिती आधीच गंभीर आहे. अनियमित वीजपुरवठ्यामुळे नुकसान वाढत आहे.