राज ठाकरे सर्वात मोठ्या पराभवाचे धनी ठरतील:देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी; जन्मामुळे मालमत्ता मिळू शकते, वारसा नाही, म्हणत उद्धव ठाकरेंवरही निशाणा

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस अधिकच तापत चालले आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याबाबत केलेल्या एका खळबळजनक वक्तव्यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे केवळ पराभूत होणार नाहीत, तर इतिहासात सर्वात मोठ्या पराभवाचे धनी म्हणून ओळखले जातील, अशी थेट भविष्यवाणी केली. निकाल आल्यानंतर हे चित्र स्पष्ट होईल, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. या वक्तव्यामुळे बीएमसी निवडणुकीच्या आधीच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुलाखतीत स्पष्ट शब्दांत सांगितले की, आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत असले तरी या युतीला आता कोणतेही राजकीय महत्त्व उरलेले नाही. त्यांच्या मते, जर 2009 सालीच शिवसेना आणि मनसे एकत्र आले असते, तर महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती आज वेगळी असती. त्या काळात या युतीला मोठ्या प्रमाणात मतदारांचा पाठिंबा मिळाला असता. मात्र आता वेळ निघून गेली असून, दोन्ही नेत्यांकडे पूर्वीसारखी मतांची ताकद राहिलेली नाही, असा दावा फडणवीस यांनी केला. विशेषतः मनसेबाबत बोलताना त्यांनी अत्यंत परखड मत मांडले. राज ठाकरे यांच्या राजकीय भवितव्यावर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या निवडणुकीनंतर राज ठाकरे यांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा पराभव होणार आहे. या युतीचा फायदा उद्धव ठाकरे यांना होऊ शकतो, मात्र राज ठाकरे यांना त्यातून काहीही मिळणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. राज ठाकरे यांच्या मतांचा आधार आता संपलेला असून, त्यांची भूमिका या युतीत दुय्यम ठरेल, असेही फडणवीस म्हणाले. त्यामुळे राज ठाकरे केवळ निवडणूक हरतील असे नाही, तर इतिहासात सर्वात मोठ्या पराभवाची नोंद त्यांच्या नावावर होईल, ही माझी ठाम भविष्यवाणी आहे, असे सांगत त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. जन्मामुळे मालमत्ता मिळू शकते, वारसा नाही याच मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली. जन्मामुळे मालमत्ता मिळू शकते, पण विचारांचा वारसा मिळत नाही, अशी खोचक टिप्पणी करत त्यांनी उद्धव ठाकरे यांना विचारधारेशी संबंधित वारसा मिळालेला नाही, असा आरोप केला. या वक्तव्यामुळे ठाकरे गटात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे थेट वैचारिक वारशावर सवाल उपस्थित केल्याने राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे दिसून येत आहे. मुंबईच्या महापौरपदाच्या मुद्द्यावरून पलटवार दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यांना ठाकरे गटाकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मुंबईच्या महापौरपदाच्या मुद्द्यावरून पलटवार केला. आम्ही सातत्याने सांगत आहोत की मुंबईचा महापौर हा मराठीच होईल, असे उद्धव ठाकरे यांनी ठामपणे स्पष्ट केले. मात्र भाजपकडून मुंबईचा महापौर हिंदू असेल, असे वक्तव्य केले जात असल्याने त्यांनी यामागील अर्थावरच सवाल उपस्थित केला. भाजप मराठी माणसाला हिंदू मानत नाही का, असा थेट प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. याच मुद्द्यावर पुढे जात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. वाक्युद्ध अधिक तीव्र होण्याची चिन्हे देवेंद्र फडणवीस हे हिंदू आहेत की नाहीत, असा सवाल करत त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचा संदर्भ दिला. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मराठी माणसांवर गोळ्या झाडणारे मोरारजी देसाई हे हिंदू होते की नव्हते, असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या हिंदुत्वाच्या दाव्यांवरच आव्हान उभे केले आहे. या वक्तव्यामुळे मराठी विरुद्ध हिंदू या मुद्द्यावरून नवा राजकीय संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे. एकीकडे देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या राजकीय अस्तित्वावर थेट प्रश्न उपस्थित करत असताना, दुसरीकडे उद्धव ठाकरे भाजपच्या हिंदुत्वाच्या व्याख्येवरच सवाल करत आहेत. बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे वाक्युद्ध अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!