“शिक्षकांनी बदलत्या शैक्षणिक‎परिस्थितीशी जुळवून घ्यावे”‎:ज्ञानसंपदा विद्यालयात आयोजित कार्यशाळेस शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानसंपदा शाळेत शिक्षक प्रशिक्षणांतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने शिक्षकांशी संवाद साधण्यात आला. “सु-मन’ या कार्यशाळेत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतील संचालक डॉ. जयंत कुलकर्णी यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. शिक्षण पद्धतीतील तर्कशुद्ध विचार मांडत, शैक्षणिक पार्श्वभूमी, बदलत्या शिक्षण पद्धतीत अध्यापन करताना बदलत्या सामाजिक परिस्थितीचा विचार करणे आवश्यक आहे यावर भर दिला. स्वातंत्र्यपूर्व शिक्षण, तेव्हाची शिक्षणाची गरज, त्या काळात उभ्या राहिलेल्या समाजसुधारकांचे व शाळांचे योगदान यावर विस्तृत चर्चा केली. स्वातंत्र्यानंतर बदललेली शिक्षणाची गरज, सामाजिक परिस्थिती व सरकारी धोरणे याविषयी प्रसंगकथनाच्या माध्यमातून संवाद साधला. विद्यार्थ्यांना भावनिक स्तरावर समजून घेणे, त्यांच्यातील कौशल्ये ओळखणे व राष्ट्रभक्ती निर्माण करणे हे साचेबद्ध अध्यापनाने शक्य नाही. यासाठी वि‌द्यार्थ्यांना प्रयोगशील बनवणे अधिक आवश्यक आहे, यावर एकमत झाले. सध्याच्या अध्यापन करताना येणाऱ्या अडचणी सामाजिक समस्या व त्यानुसार सतत प्रयोगशील असण्याची गरज यावर अर्थपूर्ण संवाद साधला गेला. या कार्यशाळेत संस्थेचे अध्यक्ष प्रवीण बजाज, उपाध्यक्ष मिलिंद गंधे, मानद सचिव अरुण कुलकर्णी, विश्वस्त श्रीहरी टिपूगडे, डॉ. सुनिता भागवत, मृणाल पोतनीस, मुख्याध्यापिका शिवांजली अकोलकर उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!