भगवंत सेवेसाठी अंत:करणातील भक्तिभावाला सर्वाधिक महत्व:हभप उद्धव महाराज मंडलिक यांचे प्रतिपादन, भाविकांची गर्दी‎

भगवंताच्या सेवेत भाव सर्वात महत्त्वाचा असून भावपूर्वक केलेली सेवाच भगवंताला प्रिय असते, असे प्रतिपादन हभप महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी केले. नेवासे बुद्रूक येथील सद्गुरु नारायणगिरी महाराज आश्रम येथे वद्य एकादशी व श्री पुरुषोत्तम मासानिमित्त आयोजित प्रवचनात ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरी महाराज व सकल देवतांच्या पूजा-आरतीने झाली. त्यानंतर सकाळी १०.३० वाजता महंत उद्धव महाराज मंडलिक यांचे प्रवचन झाले. ते म्हणाले, आज अनेकजण भक्तीचाही दिखावा करतात. देवदर्शनाच्या ठिकाणी त्या स्थानाचे महात्म्य जाणून घेण्याऐवजी फोटो काढणे व सोशल मीडियावर प्रसिद्ध करणे यालाच महत्त्व दिले जाते. मात्र, भगवंत सेवेत बाह्य दिखाव्यापेक्षा अंतःकरणातील भक्तिभाव अधिक महत्त्वाचा आहे. सद्भावनेतून पुण्य घडते. देवपूजा व उपासना ही देवऋणातून उतराई होण्याची साधने आहेत. परमेश्वराच्या कृपेने लाभलेल्या संपत्तीतील काही भाग देवकार्य व समाजकार्यासाठी अर्पण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. वारकरी संप्रदायात भक्ती हा सर्व समस्यांवरील प्रभावी उपाय मानला जातो, असेही त्यांनी नमूद केले. भगवंताने प्रत्येकाला कर्तव्य, नेतृत्व व दातृत्व यांसारखे वेगवेगळे गुण दिले आहेत. मनुष्याला आपले दुःख व्यक्त करण्याचे शेवटचे आणि हक्काचे ठिकाण म्हणजे भगवंत आहे. श्रद्धेने केलेली कोणतीही प्रार्थना वाया जात नाही. प्रार्थना ही अंधश्रद्धा नसून प्रयत्न करूनही न सुटणाऱ्या अनेक प्रश्नांना ती मार्ग दाखवते, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रपंचात कितीही गुंतून राहिले तरी शेवटी काहीच शाश्वत मिळत नाही; मात्र परमार्थासाठी केलेले कार्य कधीही वाया जात नाही. संसार सांभाळत असतानाच पुण्यकर्म करण्याची वृत्ती जोपासली पाहिजे. शास्त्रानुसार वयाच्या पन्नाशीनंतर धर्म, दान व चिंतन यांना अधिक वेळ देणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. आश्रमाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या वाटचालीत परिसरातील नागरिक व परमार्थप्रेमींचे मोठे योगदान राहिल्याचे सांगत गेल्या तीन वर्षांपासून अखंडपणे मधुकरी प्रसाद सेवा देणाऱ्या दात्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी उपस्थित पत्रकार बांधवांचा तसेच विविध प्रकारच्या सेवा देणाऱ्या दात्यांचा गुरुवर्य बाबांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आश्रमाचे शिक्षक बाळासाहेब झिने यांनी केले. श्रद्धेने केलेली प्रार्थना कधी निरर्थक नसते भगवंताने प्रत्येकाला कर्तव्य, नेतृत्व व दातृत्व यांसारखे वेगवेगळे गुण दिले आहेत. मनुष्याला आपले दुःख व्यक्त करण्याचे शेवटचे आणि हक्काचे ठिकाण म्हणजे भगवंत आहे. श्रद्धेने केलेली कोणतीही प्रार्थना वाया जात नाही. प्रार्थना ही अंधश्रद्धा नसून प्रयत्न करूनही न सुटणाऱ्या अनेक प्रश्नांना ती मार्ग दाखवते, असे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment

error: Content is protected !!