वृक्षसंवर्धनाची चळवळ उभी राहण्याची गरज‎:नगरसेवक निखील वारे यांचे प्रतिपादन, विविध 100 प्रजातींच्या वृक्षांची भेट

पर्यावरण संवर्धन आणि हरित शहराच्या संकल्पनेला बळ देणारा आदर्श उपक्रम म्हणून मनपा उपमहापौर ॲड. धनंजय जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक निखिल वारे यांनी १०० वृक्षांची भेट देत अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या. या उपक्रमामुळे नामदार राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी मोहिमेला अधिक गती मिळणार असून शहरामध्ये वृक्षारोपण व संवर्धनाची लोकचळवळ उभारण्यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरणार आहे. यावेळी उद्योजक जनक अहुजा, उद्योजक आदेश चेंगडिया, राजेंद्र बलदोटा, अभिजीत बोरुडे, सुहास मुळे, स्वप्निल दगडे, मितेश शहा, विजय वडागळे, संदीप पवार आदी उपस्थित होते. नगरसेवक निखिल वारे म्हणाले, या मोहिमेसाठी दहा ते पंधरा फूट उंचीची विविध प्रजातींचे १०० वृक्ष भेट दिले. पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास, वाढते तापमान, प्रदूषण आणि घटणारे हरित क्षेत्र यामुळे भविष्यात मानवासमोर मोठे प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्यासाठी आतापासूनच वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाची व्यापक चळवळ उभी करणे आवश्यक आहे. अहिल्यानगर शहराला हरित सिटी बनविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेत या मोहिमेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. उपमहापौर जाधव म्हणाले, नगरसेवक निखिल वारे यांनी १०० वृक्षांची भेट देऊन पर्यावरण संवर्धनाचा अत्यंत सकारात्मक संदेश दिला आहे. आपले सण, उत्सव आणि वाढदिवस हे केवळ औपचारिक न राहता समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून साजरे झाले पाहिजेत. त्यामुळे समाजामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि सामाजिक बांधिलकीची जाणीवही दृढ होते. आजच्या सोशल मीडियाच्या युगामध्ये अनेकजण पर्यावरण संवर्धनाबाबत पोस्ट आणि संदेश शेअर करतात; मात्र प्रत्यक्ष कृती करणाऱ्यांची संख्या कमी आहे. काहीजण जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करून फोटोसेशन करतात पण त्यानंतर त्या वृक्षांची काळजी घेतली जात नाही. केवळ वृक्ष लावणे नव्हे तर त्याचे संवर्धन करणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. उपस्थित मान्यवरांनी नगरसेवक निखिल वारे यांच्या पर्यावरणपूरक उपक्रमाचे तसेच उपमहापौर अॅड. धनंजय जाधव यांच्या ग्रीन सिटी मोहिमेचे कौतुक करत शहराच्या हरित भविष्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. या प्रसंगी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत नागरिकांनी मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी नागरिक उपस्थित होते. वृक्षांची काळजी घेणे महत्वाचे : जाधव काहीजण जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करून फोटोसेशन करतात पण त्यानंतर त्या वृक्षांची काळजी घेतली जात नाही. केवळ वृक्ष लावणे नव्हे तर त्याचे संवर्धन करणेही तेवढेच महत्त्वाचे असल्याचे उपमहापौर अॅड. धनंजय जाधव यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment

error: Content is protected !!