ठाणे येथील एका शासकीय कार्यक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव जाणीवपूर्वक टाळण्यात आल्याचा आरोप करत शिवसेना प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर अत्यंत शेलक्या आणि जहरी शब्दांत हल्लाबोल केला. भाजपच्या झाडावर बसलेत म्हणून वनमंत्री गणेश नाईकांचे माकडचाळे सुरू आहेत, त्यांनी हे माकडचाळे आता थांबवावेत, अशा कडक शब्दांत महाजन यांनी नाईकांवर टीका केली आहे. प्रकाश महाजन म्हणाले की, दुसऱ्याची उंची कमी केल्याने स्वतःची उंची कधीही वाढत नसते आणि समोरच्याची उंचीही कमी होत नसते. या संपूर्ण प्रकरणात राजशिष्टाचाराचे उल्लंघन करून लोकप्रतिनिधींचे नाव गाळल्याबद्दल पालिकेच्या आयुक्तांना तातडीने कारणे दाखवा नोटीस बजावायला हवी, अशी मागणी त्यांनी केली. गणेश नाईक यांच्या जुन्या विधानांचा दाखला देत, यापूर्वी बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी शेळ्या सोडण्याचे अजब फर्मान काढणाऱ्या नाईकांचे राजकारण कोणत्या पातळीचे आहे, हे सर्वांना माहीत आहे, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
डॉक्टरांच्या मनात आलं की योग्य वेळी ऑपरेशन या संभाव्य पक्षफुटीच्या पार्श्वभूमीवर आणि ‘ऑपरेशन टायगर’च्या रंगात आलेल्या चर्चांवर बोलताना प्रकाश महाजन यांनी अधिक सस्पेन्स वाढवला आहे. डॉक्टरांच्या मनात आलं की योग्य वेळी ऑपरेशन होणारच! असे अत्यंत सूचक विधान त्यांनी केले. महाजन यांच्या या विधानामुळे आगामी काळात ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसणार का, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे राजकीय लक्ष लागले आहे. उबाठाचे खासदार फुटणार असल्याची चर्चा दुसरीकडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे काही खासदार फुटणार असून ते शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांनी सध्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. रविवारी ‘मातोश्री’वर झालेल्या महत्त्वाच्या बैठकीला केवळ 5 खासदार प्रत्यक्ष हजर होते, तर 4 खासदारांनी ऑनलाइन उपस्थिती लावली होती. या घडामोडींनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुख यांनी अचानक दिल्ली गाठून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची घेतलेली भेट या चर्चांना अधिक बळ देणारी ठरली आहे. अधिकाऱ्यांवर कारवाई होणारच- शिरसाट या विषयावर बोलताना शिवसेना प्रवक्ते तथा मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, गेल्या कॅबिनेट बैठकीत मी स्वतः मुख्यमंत्र्यांसमोर हा प्रश्न उपस्थित केला. ज्या उद्घाटन सोहळ्याच्या पत्रिकेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे नाव गायब होते त्याची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. जर हाच प्रकार पुन्हा घडला असेल जबाबदार अधिकाऱ्यांवर निश्चितपणे प्रशासकीय कारवाई केली जाईल. कल्पना नाही, आयुक्तांना विचारा मंत्री गणेश नाईक म्हणाले की, आरोग्यसेवेच्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत नाव आहे की नाही याविषयी मला कोणतीही कल्पना नाही. याबाबत आपण थेट महापालिका आयुक्तांना विचारून घ्यावे. महायुतीच्या अनुषंगाने ठरलेल्या पद्धतीनेच कारभार व्हावा अशी माझी इच्छा आहे. आमच्यात कोणतीही नाराजी नाही. नाईक विरुद्ध मंदा म्हात्रे वाद आला चव्हाट्यावर दुसरीकडे याच कार्यक्रमावरुन भाजपमध्ये सुद्धा गणेश नाईकांविरोधात मंदा म्हात्रे यांच्यामध्ये वाद समोर आला आहे. नवी मुंबईत भाजप विरुद्ध शिंदेसेना वाद पेटलेला असतानाच आता भाजपमधील अंतर्गत गटबाजीचाही मोठा स्फोट झाला आहे. महापालिकेच्या कार्यक्रमातून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव जाणीवपूर्वक वगळल्याने निर्माण झालेल्या वादात आता भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी उडी घेत थेट पक्षाचेच ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांच्यावर अत्यंत आक्रमक हल्ला चढवला आहे. “माझ्या मतदारसंघात नाईकांचा आमदार निधी कशासाठी? मी अजून जिवंत आणि सक्षम आहे,’ अशा शब्दांत म्हात्रेंनी नाईकांना जाहीरपणे सुनावले. आगामी निवडणुकीला अजून तीन वर्षे बाकी असल्याचे सांगत त्यांनी अधिकृत कार्यक्रमावर पूर्णपणे बहिष्कार टाकला. त्यामुळे हा वाद केवळ निमंत्रण पत्रिकेपुरता मर्यादित नसून नवी मुंबईवरील राजकीय वर्चस्वासाठी नाईक आणि म्हात्रे यांच्यात सुरू असलेल्या तीव्र अंतर्गत सत्तासंघर्षाची किनार त्याला आहे.
