भोंदू बाबा अशोक खरात यांच्याकडे विरोधी पक्षातील कोणकोणते नेते जात होते याचे मी पुरावे देऊ शकतो. माझ्याकडे सर्वांत जास्त पुरावे आहेत, पण ते पोलिसांकडे आहेत, ते पोलिसांचे काम आहे, खरातांना भेटणाऱ्यांपैकी कुणाचे यात सहभाग असेल तर कारवाई होईल, पण केवळ भेटलंय म्हणून कारवाई करायला लागलो तर कोणी त्यांना 40 किमी पाण्याची लाईन दिली हे सर्वांना समजले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भोंदू बाबा प्रकरणी हवेत बोलण्याला काही अर्थ नाही. खरात प्रकरण अत्यंत गंभीर आहे, त्या प्रकरणाचा भांडाफोडा आम्हीच केला आहे. या प्रकरणात महिला लाजेखातर पुढे येत नाही, पण पिडीत महिलांना त्यांच्या कुटुंबियांना धीर देत पुढे आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. यात काही महिला प्रतिसाद देत आहेत. प्रकरणाकडे लक्ष घालण्याच्या सूचना मी डीजींना दिल्या आहे ते या सर्व प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. एसआयटी आणि नाशिक सीपी मिळून हे काम पूर्ण करत आहेत. या प्रकरणी कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. फोटो कुणाचेही असू शकतो देवेंद्र फडणवीस म्हणाले की, खरात प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू आहे. कुणाजवळ काही पुरावा असेल तर त्यांनी तो नक्की आणून द्यावा त्यावरही कारवाई होईल. पण विनाकारण प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करू नये. सरकार आणि पोलिस जे करायचे ते करत कठोर कारवाई करतील. फोटो कुणाचेही असू शकतो, पण ज्यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावून 40 किलोमीटरची पाइपलाइन वळवून अशोक खरातच्या संस्थेला पाणी दिले, त्या मंत्र्यांबाबत विरोधक गप्प का आहेत? केवळ फोटोवरून राजकारण करणाऱ्यांनी या धोरणात्मक निर्णयावर का मौन पाळले आहे? महिलेला न्याय देण्याचा प्रयत्न करणार देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्हाला राजकारणात नाही तर महिलांच्या प्रतिष्ठेत इंटरेस्ट आहे. महिलांवर जे अन्याय झालेत त्यासंदर्भात आधी चौकशी होईल, प्रत्येक महिलेला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत, महिलांना न्याय देण्यासाठी चौकशी करणार.
