बातमी ऐका (Marathi Voice Reader)
बीड : जिल्ह्यात यंदा पाऊस नसल्यामुळे कापूस पिकाची अवस्था दिवसेंदिवस दयनीय होत चालली असून अनेक भागांत कापसाला मोठ्या प्रमाणात फुलगळ आणि फळगळ होत असल्याचे चित्र आहे. सुरुवातीला चांगले उत्पादन मिळेल, अशी आशा असलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत आता मोठी भर पडली आहे. कापूस पिकासाठी केलेला खर्च, त्यातच प्रतिकूल परिस्थिती आणि उत्पादनात होणारी संभाव्य घट यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहण्याची शक्यता आहे.
बीड जिल्ह्यातील शेतकरी सुभाष राठोड यांनी कापूस पिकाची सद्यस्थिती सांगताना आपली व्यथा व्यक्त केली. राठोड यांच्याकडे स्वतःची दोन एकर शेती असून त्यांनी करार पद्धतीने आणखी सात एकर शेती केली आहे. अशा एकूण नऊ एकर क्षेत्रावर त्यांनी कापूस पिकाची लागवड केली. पेरणीपासून आतापर्यंत मशागत, बियाणे, खते, औषध फवारणी आणि इतर खर्च मिळून तब्बल दोन लाख रुपये खर्च झाल्याचे त्यांनी सांगितले. एवढा मोठा खर्च केल्यानंतर चांगले उत्पादन मिळेल आणि त्यातून कुटुंबाचा आर्थिक भार हलका होईल अशी अपेक्षा होती.
मात्र सध्या कापूस पिकामध्ये मोठ्या प्रमाणात फुलगळ आणि फळगळ होत असल्याने उत्पादनाच्या आशेवर पाणी फिरल्याची भावना राठोड यांनी व्यक्त केली. पिकाची वाढ आणि परिस्थिती पाहता यंदा अपेक्षेप्रमाणे कापूस उत्पादन मिळण्याची शक्यता कमी असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. आधीच शेतीचा वाढता खर्च, मजुरी, खते आणि कीटकनाशकांच्या वाढलेल्या किमती यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यातच उत्पादनात घट झाली तर केलेला खर्चही भरून निघणार नसल्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.
शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबाचा घरखर्च आणि मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही शेतकऱ्यांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे यंदा कापूस उत्पादनात मोठी घट झाली तर पुढील आर्थिक नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे. राठोड यांनी सांगितले की, शेतकऱ्याने वर्षभर मेहनत करून पिकाची काळजी घेतली मात्र शेवटी निसर्ग आणि पिकाची परिस्थिती साथ देत नसेल तर त्याच्यासमोर मोठे संकट निर्माण होते. कापूस पिकाची सध्याची अवस्था पाहता यंदाचे उत्पन्न घटणार असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान शासनाने बीड जिल्ह्यातील कापूस पिकाची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी सुभाष राठोड यांनी केली आहे. सरकारने आम्हाला फुल नाही, तर फुलाची पाकळी तरी द्यावी, अशा शब्दांत त्यांनी आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने परिस्थितीची गंभीर दखल घेऊन योग्य ती मदत करावी अशी मागणी आता शेतकरी वर्गातून होत आहे.