प्रज्ञा सातव आमदार संतोष बांगरांना आव्हान देणार?:भाजपने साखरेच्या सुरीने मित्रपक्षाचा गळा कापला, शरद पवार गटाचा आरोप

माजी आमदार प्रज्ञा सातव यांना पक्षात घेऊन भाजपने आपला मित्रपक्ष असणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेचा साखरेच्या सुरीने गळा कापल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी भविष्यात हिंगोलीत प्रज्ञा सातव ह्या शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांना आव्हान देताना दिसतील, असा दावा केला आहे. प्रज्ञा सातव यांनी आज आपल्या काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर काही वेळातच त्यांनी भाजप प्रदेश कार्यालय गाठून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे काँग्रेसला जोरदार झटका बसल्याची चर्चा सुरू आहे. पण आमदार रोहित पवार यांनी हा काँग्रेसला नव्हे तर सत्ताधारी शिवसेनेला खरा झटका असल्याचा दावा केला आहे. भाजपने साखरेच्या सुरीने मित्रपक्षाचा गळा कापला रोहित पवार म्हणाले, साखरेच्या सुरीने मित्रपक्षाचा गळा कापण्यात भाजपचा हात कुणीही धरणार नाही. याच अनुषंगाने कळमनुरी मतदारसंघात शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात उभा करण्यासाठी भाजपाने आपल्या निष्ठावंतांना अंगावरील माशी झटकावी तसं बाजूला सारलं आणि आगामी उमेदवार म्हणून प्रज्ञाताईंना पक्षात प्रवेश दिला. यावरून 2029 मध्ये मित्रपक्षांना संपवून भाजप स्वबळावर निवडणूक लढेल, हे मी अनेकदा केलेलं भाकित हळूहळू सत्यात उतरताना दिसतंय. बाकी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा प्रज्ञाताई सातव यांचा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांच्या या निर्णयाने स्व. राजीव जी सातव यांच्या आत्म्यास नक्कीच दुःख झालं असेल, असे ते म्हणालेत. मंत्री शिरसाट यांच्याही विकेटची प्रतीक्षा रोहित पवारांनी माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावरूनही सरकारवर निशाणा साधला आहे. माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा म्हणजे निसटण्याचे सगळे मार्ग संपल्याने नाईलाजाने घेतलेला हा निर्णय आहे. वास्तविक नैतिकतेच्या आधारावर कनिष्ठ न्यायालयाने शिक्षा ठोठावली तेंव्हाच त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता किंवा सरकारने तरी त्यांचा राजीनामा घेऊन सरकार खऱ्या अर्थाने ‘वेगवान’ आहे हे दाखवून द्यायला हवं होतं. यामुळं किमान कायद्याचा सन्मान तरी राखला गेला असता आणि ‘कायदा व न्याय हे सर्वांसाठी समान आहे,’ असा चांगला संदेशही समाजात गेला असता. पण तशी अपेक्षा माणिकराव कोकाटे यांच्याकडून करणंच चुकीचं आहे! असो! या राजीनाम्यातून अनेकजण धडा घेतील, ही अपेक्षा! आम्ही मात्र मंत्री शिरसाठ यांच्याही विकेटची वाट पहात आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. प्रज्ञा सातवांनी काँग्रेस सोडून चूक केली दरम्यान, काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी प्रज्ञा सातव भाजपच्या प्रलोभनाला बळी पडल्याचा आरोप केला आहे. प्रज्ञा सातव या भाजपच्या प्रलोभनाला बळी पडल्या आहेत. माझ्या मते त्यांनी काँग्रेस सोडून मोठी चूक केली आहे. 21 तारखेच्या बैठकीत प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यावर पक्षात चर्चा केली जाईल. गटबाजी सगळीकडेच असते. त्यामुळे पक्ष सोडायचा नसतो, असे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!