काँग्रेसच्या विधान परिषद आमदार प्रज्ञा सातव भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या घटनेवर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया देत भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. “भाजपला सत्तेचा माज आला असून, सत्तेच्या माध्यमातून पैसा आणि त्या पैशातून आमदारांची खरेदी, असा नवा ‘आयाम’ आणि अमित शहांचा ट्रेंड भाजपने महाराष्ट्रात सुरू केला आहे,” अशा शब्दांत पटोले यांनी भाजपवर हल्लाबोल केला. प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यावर बोलताना पटोले म्हणाले, “भाजप लोकशाही आणि संविधान मानायला तयार नाही. कुणाला पैशांचे तर कुणाला पदाचे प्रलोभन दाखवून फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. जनतेच्या पैशांची लूट करून आमदार विकत घेण्याचा अमित शाह यांच्यापासून सुरू झालेला हा ‘ट्रेंड’ आता महाराष्ट्रातही राबवला जात आहे. प्रज्ञा सातव यांना भाजपने नेमके काय प्रलोभन दिले, हे लवकरच समोर येईलच, पण ही घटना चुकीची आहे.” काँग्रेसचा आणखी एक आमदार भाजपच्या वाटेवर? प्रज्ञा सातव यांच्यानंतर काँग्रेसचा आणखी एक विधान परिषद आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. यावर बोलताना पटोले यांनी भाजपच्या फोडाफोडीच्या नीतीवर बोट ठेवले. “काँग्रेस आपले नेते सांभाळू शकत नाही, अशी टीका भाजप करत आहे, पण हे त्यांच्या सत्तेच्या माजापोटी येत असलेले बोल आहेत,” असे प्रत्युत्तर त्यांनी दिले. भारत काँग्रेसमुक्त करताना भाजप काँग्रेसयुक्त केली काँग्रेस विचारधारा कधीच संपू शकत नाही. नरेंद्र मोदी यांनी देखील त्या काळात काँग्रेसमुक्त भारत करण्याचा प्रण घेतला होता. पण शेवटी त्यांनी काँग्रेसयुक्त भाजप निर्माण केली. त्यामुळे काँग्रेस कधी संपू शकत नाही. उद्या आम्ही सत्तेत आलो, तर भाजप पूर्ण खाली होईल. भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा मोठा उद्रेक आहे, असा दावा नाना पटोले यांनी केला. विरोधी पक्षनेतेपदावरून सुनावले प्रज्ञा सातव यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस विधान परिषदेतील संख्याबळ कमी झाले आहे. त्यामुळे आता काँग्रेसला हव्या असणाऱ्या विरोधीपक्ष नेते पदावर परिणाम होणार आहे. याबाबत नाना पटोले यांना विचारले असता, भाजपला विरोधी पक्षनेते पद द्यायचे नव्हते. जनतेचे प्रश्न मांडायचे आणि सोडवायचे ही लोकशाहीतील व्यवस्था आहे. पण भाजपला लोकशाही आणि संविधान मान्य नाही. यंदाचे हिवाळी अधिवेशन देखील विरोधीपक्ष नेत्याशिवाय चालले. काँग्रेसने इंदिरा गांधींच्या काळात विरोधकांचे दोन खासदार असताना विरोधीपक्ष नेतेपद दिले होते. लोकशाहीत सत्तेची आणि विरोधकाची अशी दोन चाके असतात. ही परंपरा भाजपने मोडकळीस काढलेली आहे. त्यामुळे संख्याबळ हा प्रश्न नसतो. काँग्रेसने विरोधकांचे दोन आमदार असताना सुद्धा विरोधीपक्ष नेते पद दिले होते. त्यामुळे काँग्रेसने ठेवलेली लोकशाहीची जाण भाजपकडे नाही. त्यामुळे एक आमदार कमी झाला किंवा जास्त झाला याची चर्चा होऊ शकत नाही, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
