महाराष्ट्रात तापमानाचा पारा घसरला:पुढील दिवसांत आणखी गारठा वाढण्याची शक्यता; विदर्भ ते मराठवाडा हुडहुडीच, नांदेडमध्ये किमान तापमान 8.9 अंशांपर्यंत खाली

देशासह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये थंडीचा प्रभाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. हिवाळ्याच्या सुरुवातीलाच तापमानात लक्षणीय घट झाल्याने नागरिकांना सकाळ-संध्याकाळ हुडहुडी भरू लागली आहे. राज्यात सध्या बहुतांश भागात कोरडे वातावरण राहणार असून पुढील काही दिवस हवामानात मोठा बदल होणार नसल्याचे संकेत हवामान अभ्यासकांकडून दिले जात आहेत. मात्र, येत्या दोन दिवसांत कमाल आणि किमान तापमानात किंचित वाढ होईल, त्यानंतर पुन्हा एकदा तापमान 2 ते 3 अंशांनी घसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे हिवाळ्याचा कडाका आणखी तीव्र होणार असल्याचे चित्र आहे. राज्यातील विदर्भ विभागात थंडीचा प्रभाव सर्वाधिक जाणवत आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये किमान तापमान 12 अंशांच्या खाली घसरले आहे. यवतमाळ जिल्ह्यात आज किमान 9.6 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली असून अकोला आणि नागपूर येथे तापमान थेट 10 अंशांवर आले आहे. पहाटेच्या वेळी गारवा जाणवत असल्याने नागरिकांनी उबदार कपड्यांचा आधार घ्यायला सुरुवात केली आहे. ग्रामीण भागात तर थंडीचा फटका अधिक तीव्र असून शेतकरी, शेतमजूर आणि सकाळी लवकर कामावर जाणाऱ्यांना या थंडीचा मोठा सामना करावा लागत आहे. मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये पहाटे दव मराठवाड्यातही थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे. नांदेडमध्ये किमान तापमान 8.9 अंशांपर्यंत खाली आले असून हा या हंगामातील आतापर्यंतचा सर्वात कमी आकडा मानला जात आहे. छत्रपती संभाजीनगर येथे तापमान 11 अंशांवर नोंदवण्यात आले, तर परभणीत पारा थेट 10.8 अंशांवर घसरला आहे. मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये पहाटे दव पडत असून रस्त्यांवर गार वारे वाहत आहेत. थंडीमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. रात्री आणि पहाटेच्या वेळी गारठा अधिक वाढण्याची शक्यता मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातही थंडीचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो आहे. जळगाव जिल्ह्यातील जेऊर येथे किमान तापमान थेट 7 अंश सेल्सियसपर्यंत खाली आले असून हा राज्यातील सर्वात कमी तापमानांपैकी एक आहे. नगरमध्ये 8.5 अंश तापमानाची नोंद झाली असून नागरिकांना तीव्र थंडीचा अनुभव येत आहे. नाशिकमध्ये तापमान 9.8 अंशांवर गेले आहे, तर पुण्यात किमान तापमान 10.4 अंशांवर नोंदवण्यात आले. सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये तापमान 11 ते 13 अंशांच्या दरम्यान आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील आठवडाभर राज्यात पावसाची शक्यता नसून कोरडे वातावरण कायम राहील. मात्र, उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे रात्री आणि पहाटेच्या वेळी गारठा अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेत उबदार कपडे वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!