मुंबई महापालिकेसाठी सर्वच राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. त्यात आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी युती केली आहे. आज शिवसेना भवनात संयुक्त पत्रकार परिषद घेत ठाकरे बंधू मुंबईसाठी वचननामा प्रकाशित करणार आहेत. ‘मुंबईकरांसाठी शिवशक्तीचा वचननामा’ असे या वचननाम्याला नाव देण्यात आले आहे. ठाकरे बंधूंच्या आजच्या पत्रकार परिषदेपूर्वी शुक्रवारी आमदार आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत मुंबईसाठी वचननामा सादर केला होता. हा वचननामा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी आदित्य ठाकरे यांनी दिली होती. त्यानुसार आज शिवसेना भवनात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत वचननामा जाहीर केला. विशेष म्हणजे राज ठाकरे हे तब्बल 20 वर्षांनंतर शिवसेना भवनात आले असल्याने शिवसैनिक आणि मनसैनिकांसाठी हा क्षण विशेष ठरला आहे. पत्रकार परिषदेच्या सुरुवातील खासदार संजय राऊत यांनी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर दोन्ही ठाकरे बंधूंनी वचननाम्याचे प्रकाशन केले. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, 20 वर्षानंतर मला सुटून आल्यासारखे वाटत आहे. राज ठाकरे 20 वर्ष जेलमध्ये होते आज त्यांचे स्वागत करू. आज खूप वर्षांनी मी इथे आलो. मला नवीन शिवसेना भवन मी पहिल्यांदाच बघत आहे. माझ्या मनात ज्या आठवणी कोरल्या गेल्या आहेत, त्या जुन्या शिवसेना भवनाच्या होत्या. त्या आठवणी रोमांचकारी आणि आनंददायी होत्या. उद्धव ठाकरे म्हणाले, राज ठाकरे इथे आले याचा आनंदच आहे. आज आपल्या सर्वांसमोर शिवशक्तीचा वचननामा आम्ही जनतेच्या चरणी सादर करत आहोत. या शिवशक्तीमध्ये शिवसेना आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे, शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आहे. हा वचननामा आपल्या माध्यमातून सादर केला आहे. पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आता झुंडशाही सुरू झाली आहे. मतचोरी त्यांची उघडकीस आणल्यानंतर त्यांनी आता उमेदवार पळवणे सुरू केले आहे. बिनविरोध निवडणूक प्रक्रिया जे ते राबवत आहेत, हे लोकशाचा अपमान आहे. राहुल नार्वेकर यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केला आहे. त्यांच्यावर राज्य निवडणूक आयोगाने कारवाई करायला पाहिजे. कारण विधानसभा अध्यक्ष हा कोणत्याही पक्षाचा नसतो आणि तो कोणत्याही पक्षाच्या प्रचारासाठी किंवा समर्थनासाठी जाऊ शकत नाहीत. परंतु, त्यांनी संरक्षण काढून घेण्याचे आदेश जे काही दिले, हा त्यांना अधिकार बाहेर नसतो, विधानसभेत असू शकतो. उद्धव ठाकरे यांनी राज्य निवडणूक आयोगावर देखील टीका केली आहे. सत्ताधाऱ्यांचे गुलाम झाल्याची टीका त्यांनी निवडणूक आयोगावर केली आहे. तसेच राहुल नार्वेकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच जिथे बिनविरोध निवडणुका झाल्या, तिथे आयोगाने पुन्हा निवडणुका घ्यायला पाहिजेत, अशी देखील मागणी उद्धव ठाकरेंनी केली. कैलास पर्वत मोदींनी बांधले, याचे श्रेय घ्या; उद्धव ठाकरेंचा टोला महायुतीने जे काही काम केल्याचे दाखवले आहे. म्हणजे आम्ही जी कामे 20 वर्षात केली, त्याचे श्रेय घेत होय हे आम्ही केले म्हणत बॅनर लावत आहेत. आमची छोटी छोटी कामे आहेत. कैलास पर्वत मोदींनी बांधले, गंगा मोदींनी स्वर्गातून आणली, या कामांचे श्रेय घ्या. अरबी समुद्र मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेंनी निर्माण केले, याचे श्रेय घ्यावे, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. राज ठाकरे यांनी बिनविरोध निवडणुकीवर बोलताना त्यांनी पश्चिम बंगालचे उदाहरण दिले. तिथे जेव्हा असे बिनविरोध निवडणुका झाल्या तेव्हा भाजपने यावर आवाज उठवला होता. आता ते करत आहेत, तर यावर कुठेतरी विचार व्हायला हवा. आम्ही सत्तेतून कधीच बाहेर होणार नाही, असे त्यांना वाटत असेल तर हा त्यांचा भ्रम आहे. दुसरे जेव्हा सत्तेत येतील तेव्हा याहून काय वाईट होऊ शकते, याचा विचार त्यांनी करायला पाहिजे. महाराष्ट्र हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवली आहे. महाराष्ट्रातील पिढीचे वाटोळे केले जात आहे. या सगळ्याच विचार सर्वच राजकीय पक्षांनी करणे गरजेचे आहे, असा सल्ला राज ठाकरे यांनी दिला. पालिकेच्या ठेवी कॉन्ट्रॅक्टरचे बूट चाटायला नसतात- उद्धव ठाकरे मुंबई महापालिकेच्या निधीतून आपण कोस्टल रोड तयार केला आहे आणि तोही टोल मुक्त. मुंबई महापालिका ही एकमेव महापालिका होती, असे म्हणावे लागेल, ज्यात आपण 92 हजार कोटीपर्यंत ठेवी ठेवल्या होत्या. यातूनच आपण विकासकामे केली आहेत. नितीन गडकारींचा मुंबई-गोवा महामार्ग अजूनही तयारच होत आहे. ठेवी या काही चाटायला नसतात, पण याच ठेवी कॉन्ट्रॅक्टरचे बूट चाटायला नसतात, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. साधारण 3 लाख कोटींचा घोटाळा महायुतीने केला आहे. ही माझ्याकडे माहिती आली असल्याचे ठाकरेंनी म्हटले. हा महाराष्ट्र आहे आणि इथला प्रत्येक महापौर मराठीच होणार- राज ठाकरे मराठी महापौरच्या मुद्द्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, हा महाराष्ट्र आहे आणि इथला प्रत्येक महापौर हा मराठीच होणार. इथे कसले हिंदी मराठी करता? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हा महाराष्ट्र आहे, इथे मराठीचा मान ठेवलाच पाहिजे. मुंबईचा महापौर मराठीच होणार, असेही राज्य ठाकरेंनी ठणकावून सांगितले. राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या कामांसाठी परवानगी असे, पण आम्ही जी काही चांगली कामे वचननाम्यात मांडली आहेत त्याला केंद्र आणि राज्याने विरोध करून दाखवावा, असे राज ठाकरे यांनी म्हटले. आम्ही ज्या काही योजना करण्याचं म्हणत आहोत, त्याला केंद्र आणि राज्य सरकारने नाकारावे, मग बघू, असेही ठाकरे म्हणाले. तसेच मुंबई महापालिका भाजपकडे गेली तर महापालिकेचे ‘आदानीस्तान’ होईल, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
