सांगली शहरातील राम मंदिर चौकात आज पहाटे अचानक छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला. हा पुतळा रविवारी शहरातील त्रिकोणी बागेत बसवण्यात येणार होता. पण तत्पूर्वीच तो राम मंदिर चौकात बसवण्यात आल्याने काहीसा तणाव निर्माण झाला. पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत हा पुतळा तेथून काढला. यासंबंधीच्या माहितीनुसार, शहरातील त्रिकोणी बागेत छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात येणार होते. त्याचे भूमिपूजन आयुक्त सत्यम गांधी यांच्या हस्ते होणार होते. पण तत्पूर्वीच शिवतेज सावंत, आदित्य नाईक, आशिष खिचडे, अमित पाटील, सुजल कांबळे, राहुल माने, ऋषिकेश भोई आदी 60-70 जणांनी एकत्रित येऊन शनिवारी पहाटे 4.30 वा. हा पुतळा राम मंदिर चौकातील चबुतऱ्यावर उभारला. कार्यकर्त्यांचा युक्तिवाद काय? या कार्यकर्त्यांनी सांगितले की, प्रस्तुत पुतळा राम मंदिर चौकातील चबुतऱ्यावर बसवण्यासाठी 16-17 वेळा आंदोलने करण्यात आली. त्यासाठी अनेक निवेदने दिली. त्यानंतरही प्रतापसिंह उद्यानात पुतळा बसवण्याचे मनपाने मान्य केले. पण त्यानंतर अचानक हा पुतळा त्रिकोणी बागेत बसवण्याचा ठराव घेण्यात आला. ज्या लोकांनी पुतळ्यासाठी पाठपुरावा केला, त्यांना विचारात न घेता पुतळ्याचे ठिकाण बदलण्यात आले. रणभूमीत लढलेल्या योद्ध्याचा पुतळा बागेत बसवणे हे आम्हाला मान्य नव्हते. त्यामुळे आम्ही हा पुतळा राम मंदिर चौकात बसवला. ते पुढे म्हणाले, शहारातील सिव्हिल हॉस्पिटल व बस स्थानकाकडे जाणारा मार्ग अत्यंत वर्दळीचा आहे. त्यामुळे आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांचा सणही चांगल्या पद्धतीने साजरा करता येणार नाही. काही नेत्यांच्या हट्टामुळे हा पुतळा त्रिकोणी बागेत बसवण्याचा घाट घालण्यात आला. त्याला आमचा विरोध आहे. काय म्हणाले पोलिस अधिकारी? दुसरीकडे, छत्रपती संभाजी महाराजांचा उद्या त्रिकोणी बागेत उभारण्यात येणारा पुतळा शनिवारीच राम मंदिर चौकात बसवण्यात आल्याने काहीसा तणाव निर्माण झाला होता. पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत हा पुतळा तेथून हटवला. पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी या प्रकरणी सांगितले की, राम मंदिर चौकात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आल्याची बाब अवघ्या 10 मिनिटांतच आमच्या गुड मॉर्निंग पथकाच्या निदर्शनास आली. त्यानंतर डीवायएसपी संदिप भागवत यांनी मनपाचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना घटनास्थळी बोलावून घेतले. त्यांनी चर्चेचे आश्वासन दिल्यानंतर सकाळी 6.40 वा. संबंधितांनीच पुतळा काढून घेतला. या प्रकरणी आता मनपात बैठक होईल. दरम्यान, या घटनेनंतर घटनास्थळी दंगल नियंत्रण पथकाने तत्काळ धाव घेतली होती.