वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडर यांनी शनिवारी पुन्हा एकदा सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला. भाजप हा आतापर्यंत केवळ खाणाऱ्यांचा पक्ष होता. तो आता बलात्काऱ्यांचा पक्ष झाला आहे. या पक्षाने बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपीला स्वीकृत नगरसेवकपद दिले आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबातील मुली सुरक्षित ठेवायच्या असतील तर भाजपला मतदान करू नका, असे ते म्हणालेत. बदलापूर येथील एका शाळेत काही महिन्यांपूर्वी 2 चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी अक्षय शिंदेसह तुषार आपटेवर गुन्हा दाखल केला होता. पण आता भाजपने या तुषार आपटेलाच कुळगाव बदलापूर नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पद बहाल केल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणी टीकेची झोड उठल्यानंतर आपटेने आपल्या पदाचा राजीनामा दिला. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी भाजपच्या मतदारांना आपल्या कुटुंबातील मुले, मुली सुरक्षित ठेवण्यासाठी यावेळी भाजपला मतदान न करण्याचे आवाहन केले आहे. भाजप व संघाने व्यभिचाराचा मार्ग निवडला प्रकाश आंबेडकर म्हणाले, भाजप व संघाच्या लोकांना आपल्या कुटुंबातील मुले व मुली शाबूत ठेवायच्या असतील तर भाजपला मतदान करू नका. कारण, बदलापूरमध्ये जे कांड झाले होते, त्यातील सूत्रधाराला भाजपने स्वीकृत नगरसेवकाचे पद दिले आहे. भाजप हा आतापर्यंत खाणाऱ्यांचा पक्ष होता, पण आता तो बलात्काऱ्यांचा पक्ष झाला आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना आता भाजप प्रतिष्ठित नागरीक म्हणून आपल्या पक्षात स्थान देत आहे. भाजप व संघाने हा व्यभिचाराचा मार्ग अवलंबला आहे. हे थांबवायचे असेल तर संघ व भाजपच्या ज्या लोकांना आपले कुटुंब सुरक्षित रहावे असे वाटत असेल तर त्यांनी महापालिका निवडणुकीत भाजपला मतदान करू नये. भाजपचे हे जे नवीन कॅरेक्टर उभे राहत आहे, त्याला आम्ही बदलू शकत नाही. या कॅरेक्टरला बदलायचे असेल तर भाजप व संघाला मतदान करणारा मतदारच ते बदलू शकतो. मी या सर्वांना आवाहन करतो की, मतभेद निश्चितपणे आहेत. टोकाचे मतभेद आहेत. पण केवळ मतभेद आहेत म्हणून आम्ही व्यभिचाराचा मार्ग अवलंबलेला नाही. भाजप व संघाने व्यभिचाराचा मार्ग अवलंबला आहे. ते थांबवणे आमच्या नव्हे तर तुमच्या हातात आहे. हे थांबवायचे असेल तर या महापालिका निवडणुकीत भाजप व संघाच्या मतदारांनी भाजपला मतदान करू नये. हे केले तर तुमच्या नेतृत्वाला योग्य तो संदेश मिळेल. भ्रष्टाचारी व बलात्कारी लोकांना तुम्ही साथ देणार असाल तर आम्ही तुमच्या बरोबर नाही हा संदेश देऊन तुम्ही आपला पक्ष वाचवा असे मी आवाहन करतो, असे प्रकाश आंबेडकर संघ व भाजपच्या मतदारांना आवाहन करताना म्हणाले.
