जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निकाल समोर येण्यास सुरुवात झाली असून महायुती आणि विशेषतः भाजपला बहुतांश ठिकाणी चांगल्या जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत देखील महायुतीचे वर्चस्व पाहायला मिळाले आहे. तर पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला घवघवीत यश मिळाले आहे. या निवडणुकांच्या निकालांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निकाल हाती येत आहेत. आतापर्यंत हाती आलेले निकाल आणि अंतिम टप्प्यातले कल पाहता महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा महायुतीवर विश्वास दाखवला असल्याचे दिसत आहे. 12 जिल्हा परिषदांमध्ये भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थापित झाला आहे. या सगळ्या जिल्हा परिषदांमध्ये महायुतीचीच सत्ता येणार असल्याचे स्पष्ट आहे. 60 ठिकाणी भाजप नंबर एकवर पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले, साधारण आपण बघितले तर जवळपास 60 ठिकाणी भाजप नंबर एकवर आहे. छत्रपती संभाजीनगर, सिंधुदुर्ग, सोलापूर, सांगली, धाराशिव, परभणी आणि सातारा. शिवसेना दोन ठिकाणी नंबर एकवर आहे, रत्नागिरी आणि रायगड. राष्ट्रवादी कॉंग्रेस पुण्यात नंबर एकवर आहे. जिथे तीनही पक्ष एकत्रित लढलो अशा कोल्हापूर आणि लातूरमध्ये देखील आम्हीच नंबर एकवर आहोत. त्यामुळे मला असे वाटते की अतिशय चांगला हा कल समोर आलेला आहे. भाजपसाठी देखील आपला 2017 चा रेकॉर्ड तोडला आहे. 2017 साली भाजपला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत 141 जागा होत्या. आता अजून निकाल पूर्ण व्हायचे आहेत, पण घोषित झालेल्या निकालात 236 जागा भाजपला मिळाल्या आहेत. आपण जर पंचायत समितीचा विचार केला, आत्तापर्यंत घोषित जागा ज्या झालेल्या आहेत त्यात 2017 साली भाजपला एकूण 284 जागा होत्या, आताचा जो कल आहे त्यात 410 जागा भाजपला मिळाल्या आहेत. तसेच आमच्या मित्रांना सुद्धा चांगल्या जागा मिळाल्या आहेत. 125 पैकी साधारणपणे 50 पंचायत समिती भाजपकडे असतील, 26 शिवसेनेकडे असतील, 23 राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असतील. त्यानंतर 7-8 कॉंग्रेसकडे, 7-8 शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे आणि उबाठाकडे 5 अशी आत्ताची परिस्थिती आहे. त्यामुळे इथे देखील महायुतीला 125 पैकी शंभरच्या वर पंचायत समिती जिंकता आल्या आहेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, या निवडणुकांच्या दरम्यान, आमचे महायुतीमधील वरिष्ठ नेते अजितदादा पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याचे दुःख आमच्या सर्वांना आहे. त्यामुळे मी निर्णय घेतला होता की मी प्रचार करणार नाही. त्यामुळे मी फक्त आवाहनाचा व्हिडिओ केला होता. एकूणच महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाची जी मानसिकता आहे, ती मानसिकता समोर आली आहे. पहिले नगरपालिका, मग महानगरपालिका आणि आता जिल्हा परिषद या सगळ्या निवडणुकांत महाराष्ट्र सरकारने केलेले जे काम आहे, या कामावर महाराष्ट्राच्या जनतेने शिक्कामोर्तब केला आहे. विरोधकांमध्ये लढण्याच्या इच्छाशक्तीचा अभाव देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही या विचारांचे आहोत की कोणीही पर्मनन्ट जिंकत नसते आणि कोणीही पर्मनन्ट हारत नसते. पण जे लोक आपल्या पराभवाचे कारणे शोधण्याच्या ऐवजी कोणावर तरी खापर फोडतात ते मात्र कधीच जिंकू शकत नाहीत, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे. तसेच महाविकास आघाडी फारशी कुठे दिसत नाही. रोज सकाळी 9 वाजता त्यांचे प्रवक्ते जे बोलतात, त्याने आम्हाला फायदाच होतो. त्यामुळे आम्हाला फारसे काही करायची गरजच पडत नाही. लोकांचा त्यांच्यावरचा विश्वासही आता रोज कमी होत चालला असल्याचे फडणवीस म्हणाले. विरोधकांमध्ये जी लढण्याची इच्छाशक्ती पाहिजे त्याचा अभाव दिसत आहे. जनतेत जाऊन काम करावे लागते, पण विरोधी पक्ष हा केवळ माध्यमांमध्ये दिसतो. जोपर्यंत तो माध्यमांमध्ये आहे तोपर्यंत जनता त्यांच्यासोबत जाणार नाही, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. शरद पवार अतिशय नीट बरे होतील शरद पवार यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला पण ही माहिती माध्यमातूनच समजली. गेली काही दिवस जो स्ट्रेस होता त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली असेल. पण मला विश्वास आहे की त्यांची तब्येत ठीक होईल आणि आमच्या सर्वांच्या प्रार्थनाही त्यांच्यासोबत आहेत आणि शुभेच्छाही त्यांच्यासोबत आहेत, त्यामुळे ते अतिशय नीट बरे होतील. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करावी दरम्यान, कर्नाटकमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याच्या विटंबनाची घटना घडली होती. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ही अतिशय गंभीर घटना आहे. अशा प्रकारची घटना करण्यात आली हा खरोखर विकृत अशा मानसिकतेचा प्रकार आहे आणि त्याहीपेक्षा त्याच्यावर काही लोकांनी ज्या प्रकारे राजकारण करण्याचा प्रयत्न केला, काही लोकांनी त्याच्या सत्यतेत न जाता जाणीवपूर्वक नरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला, त्या लोकांच्या बद्दल मला दुःख वाटते की कोणी हे काम केले आहे, हे शोधण्यापेक्षा कोणावर तरी हे थोपण्याची इच्छा त्या लोकांमध्ये जास्त दिसते. पण आमची मागणी आहे की तिथल्या सरकारने ज्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना केली आहे त्यांना शोधून काढावे आणि कडक शिक्षा व्हावी.