शेतकरी आत्महत्या व दुचाकी अपघाताने कामगाराचा अंत
ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी
झरी जामणी तालुक्यातील भेंडाळा परिसरात १५ जानेवारी रोजी एकाच रात्री दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. आर्थिक अडचणींमुळे एका तरुण शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली, तर दुसऱ्या घटनेत दुचाकी अपघातात एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला.

सलग पिकांची नासाडी, वाढते कर्ज आणि मानसिक तणावातून मारोती नानाजी तुरणकर (वय ३५, रा. भेंडाळा) या तरुण शेतकऱ्याने शेतात विष प्राशन करून जीवन संपविल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली. मारोती तुरणकर हे पूर्णतः शेतीवर अवलंबून होते. गेल्या काही हंगामांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे त्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते.
नुकसानभरपाई न मिळाल्याने आणि कर्जबाजारीपणामुळे ते तीव्र मानसिक तणावात होते, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली.
घटनेच्या दिवशी ते शेताकडे गेले होते. बराच वेळ झाला तरी परत न आल्याने त्यांच्या भावाने शोध घेतला असता ते विष प्राशन केलेल्या अवस्थेत आढळून आले.
घटनेची माहिती मिळताच मुकुटबन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, याच परिसरात दुचाकी अपघातात संतोष गणपत वरारकर (वय ३८, मूळ रा. वडगाव, जि. चंद्रपूर; सध्या रा. भेंडाळा) या कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. १५ जानेवारी रोजी सकाळी भेंडाळा ते अर्धवन रोडवरील नाल्याजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासात दुचाकी घसरून किंवा जंगली जनावराच्या धडकेमुळे हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी मृतकाचे सासरे रामदास सदाशिव पोले (रा. भेंडाळा) यांनी मुकुटबन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अपघाताची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
एकाच रात्री घडलेल्या या दोन घटनांमुळे भेंडाळा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शेतकरी आत्महत्येच्या घटनेनंतर शासनाने तातडीने मदत, कर्जमाफी व मानसिक आधार देण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. तर वरारकर कुटुंबावर अचानक आलेल्या या संकटामुळे परिसरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
