Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

निकालानंतर शिंदे समर्थकाच्या कारला आग, CCTVत थरार कैद:बाटलीतला ज्वलनशील द्रव आणि काडेपेटीचा वापर; पराभूत उमेदवाराच्या नातेवाइकाचा आरोप

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूक निकालानंतर राजकीय वातावरण तापलेले असतानाच थेरगाव परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर मध्यरात्री एका कारला जाणीवपूर्वक आग लावण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय तणाव अधिकच वाढला आहे. विशेष म्हणजे, ही कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पराभूत उमेदवाराच्या नातेवाइकाची असल्याने, या घटनेला राजकीय वळण मिळाले आहे. आरोपी हा राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असल्याचा थेट आरोप करण्यात आला असून, पोलिसांकडून मात्र अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये धक्कादायक तपशील स्पष्टपणे दिसून येतात. एका अज्ञात व्यक्तीने आधी एका बाटलीतून ज्वलनशील द्रव थेट उभ्या असलेल्या कारवर फेकल्याचे या दृश्यांमध्ये स्पष्ट होते. त्यानंतर त्या व्यक्तीने काडेपेटीचा वापर करून क्षणार्धात कारला आग लावली आणि घटनास्थळावरून पळ काढला. काही क्षणांतच संपूर्ण कारने पेट घेतल्याचे या व्हिडीओत दिसते. ही घटना इतकी नियोजित आणि थंड डोक्याने करण्यात आल्याचे चित्रण सीसीटीव्हीमधून समोर येत असून, त्यामुळे हा अपघात नसून जाणीवपूर्वक केलेला जाळपोळ प्रकार असल्याचा संशय अधिक बळावला आहे. ही कार आकाश बारणे यांच्या मालकीची असल्याची माहिती समोर आली आहे. आकाश बारणे हे शिंदे शिवसेनेच्या पराभूत उमेदवाराचे चुलत भाऊ असून, प्रभाग क्रमांक 23 म्हणजेच थेरगाव परिसरात ही घटना घडली. निकालानंतर काही तासांतच अशी घटना घडल्याने ती निवडणूक निकालाशी संबंधित राजकीय आकसातून घडली का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. आकाश बारणे यांनी थेट आरोप करत सांगितले आहे की, एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यानेच त्यांची कार पेटवली आहे. या संदर्भात त्यांनी काळेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे सादर करण्यात आले आहे. मात्र, या प्रकरणात अद्याप पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल न केल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट पुरावे दिसत असतानाही कार जाळण्यासारख्या गंभीर गुन्ह्यात विलंब का केला जात आहे, असा सवाल स्थानिक नागरिक आणि राजकीय वर्तुळातून केला जात आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत आहेत का, असा संशयही व्यक्त केला जात आहे. निवडणूक निकालानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर असताना, अशा घटनांवर तातडीने कारवाई होणे अपेक्षित असते. मात्र या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर थेरगाव परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मध्यरात्री उभ्या असलेल्या वाहनाला अशा पद्धतीने आग लावली जाऊ शकते, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही उपस्थित होत आहे. निवडणुकीनंतर राजकीय वाद विकोपाला जाऊन हिंसक स्वरूप धारण करत असल्याचं चित्र पिंपरी-चिंचवडमध्ये दिसत असल्याने, नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे. राजकीय मतभेद हे लोकशाहीचा भाग असले तरी त्यातून जाळपोळ, हिंसाचार आणि मालमत्तेचे नुकसान होणे अत्यंत गंभीर बाब असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. प्रशासनावरही दबाव वाढण्याची शक्यता या संपूर्ण प्रकरणामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निकालानंतरची राजकीय धुसफूस आता रस्त्यावर उतरल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. एकीकडे सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट पुरावे समोर असताना दुसरीकडे पोलिसांकडून ठोस कारवाई न होणं, यामुळे प्रशासनावरही दबाव वाढण्याची शक्यता आहे. आता या प्रकरणात गुन्हा दाखल होणार का, आरोपीचा शोध घेतला जाणार का आणि राजकीय दबावाखाली तपास दडपला जाणार का, याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलं आहे. निवडणुकीनंतर शांतता राखण्याची जबाबदारी प्रशासनावर असताना, अशा घटनांमुळे पिंपरी-चिंचवडमधील राजकीय वातावरण आणखी पेटण्याची चिन्हं दिसत आहेत.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!