पराभवाने खचायचे नाही, काम करत राहायचे:अजित पवार यांचा कार्यकर्त्यांना सल्ला; मनपा निवडणुकीत अंदाज चुकल्याची दिली कबुली

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिका निवडणुकीत मिळालेल्या विजयाबद्दल भाजपचे कौतुक केले आहे. भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढली. त्यांना अतिशय चांगले यश मिळाले व इतरांचा पराभव झाला. पराभवाने खचायचे नसते. आपण आपले काम करत राहायचे असते, असे ते म्हणालेत. महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची प्रचंड हाराकिरी झाली आहे. राज्यातील 29 महापालिकांत या पक्षाला केवळ 167 जागांवर समाधान मानावे लागले. विशेषतः पुणे महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादीची युती असूनही त्यांना केवळ 30 जागांवर समाधान मानावे लागले. पिंपरी चिंचवडमध्येही त्यांना केवळ 37 जागा मिळाल्या. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी भाजपचे कौतुक करत राष्ट्रवादी काँग्रेस भविष्यात अधिक जोमाने काम करेल असे स्पष्ट केले. मीडियासह आमचेही अंदाज चुकले अजित पवार म्हणाले, लोकशाहीत मतदार राजा हा फार महत्त्वाचा असतो. प्रयत्न करणे प्रत्येक राजकीय पक्षाचे काम असते. प्रत्येकांनी प्रयत्न केले. पण भाजपला अतिशय चांगले यश मिळाले. या प्रकरणी मी भाजपचे मनापासून अभिनंदन करतो. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपने या सगळ्या निवडणुका लढल्या. त्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यात इतरांचा पराभव झाला. माझे स्वतःचे गणित असे आहे की, पराभवाने खचून जायचे नसते. पुन्हा आपले काम करत राहायचे असते. आज पहाटे 3 वाजेपर्यंत काही जागांवरील निकाल लागले. त्यानंतर आम्ही बसून कुठे काय झाले? याची माहिती घेऊ. मीडिया सुद्धा म्हणत होता की चांगले वातावरण आहे. आमचे अंदाज चुकले, तसे मीडियाचेही अंदाज चुकले. ठीक आहे. झेडपी निवडणुकीचा निर्णय स्थानिक पदाधिकारी घेतील अजित पवार म्हणाले, सध्या निवडणुकीची घाई आहे. आज 17 तारखेपासून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे फॉर्म भरण्यास सुरुवात झाली. उद्या 18 तारखेला सुट्टी आहे. सुप्रीम कोर्टाने 31 तारखेच्या आत निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते. त्यात आता 15 दिवसांची वाढीव मुदत मिळाली आहे. आता 50 टक्के आरक्षणाच्या आत केवळ 12 जिल्हा परिषदा आहेत. तेथील भौगोलिक व राजकीय परिस्थिती पाहून आमचे स्थानिक पदाधिकारी योग्य तो निर्णय घेतील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना अधिकार दिले जातात. त्यानुसार ते लोक तेथील योग्य तो निर्णय घेतात. आतापर्यंतच्या सर्वच निवडणुकांत असे होते. तूर्त आम्ही महायुतीत काम करत आहोत. सध्या केंद्रात व राज्यात महायुतीचे सरकार आहे. आमचे त्यांच्यासोबत काम सुरू आहे, असे ते म्हणाले. पवार कुटुंब एकत्रच राहील उद्योगपती गौतम अदानी नुकतेच बारामतीच्या दौऱ्यावर येऊन गेलेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत केंद्रात व राज्यात काय बदल दिसून येतील असा प्रश्न यावेळी पत्रकारांनी अजित पवारांना विचारला. त्यावर ते म्हणाले, गौतम अदानी बारामतीला एआयच्या इमारतीच्या उद्घाटनाला आले होते. ते एक उद्योगपती आहेत. त्या उद्योगपतींचा व सरकारमध्ये बदल होण्याचा काय संबंध आहे? असे ते म्हणाले. पत्रकारांनी पुन्हा त्यांना पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार का? असा प्रश्न केला. त्यावरही अजित पवार म्हणाले, आम्ही कुटुंब म्हणून एकत्र राहूच ना. आम्ही सुखदुःखात एकमेकांना धावून जातोच. माझ्या दृष्टीने आत्ता कृषी प्रदर्शन खूप महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र हे कृषीप्रधान राज्य आहे. त्यामुळे शेतकरी जेवढे समाधानी ठेवू शकते, तेवढे ते आर्थिक सुबत्ता येण्यासाठी चांगले असते. त्यामुळे मी त्या कामाला जास्त प्राधान्य देतो, असेही अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले.

Leave a Comment

error: Content is protected !!