Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

मुंबईच्या महापौरपदासाठी पडद्यामागे जोरदार हालचाली:शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक ठाकरे गटाच्या संपर्कात, ‘मातोश्री’वर फोनाफोनी?

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला यश मिळाले असले, तरी काठावरचे बहुमत मिळाले आहे. त्यामुळे मुंबईचा महापौर कोणाचा होणार? यावरून कमालीची गुप्तता आणि रस्सीखेच पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या सर्व २९ नगरसेवकांना वांद्रे येथील ‘ताज लँडस् एन्ड’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये हलवले आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस सध्या दावोस दौऱ्यावर असताना मुंबईत मोठा ‘दगाफटका’ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचदरम्यान, एकनाथ शिंदेंचे काही नगरसेवक ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. यावरून मुंबईच्या राजकारणात पुन्हा उलथापालथ होणार का‌? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. बीएमसी निवडणुकीत भाजपने ८९ जागांवर विजय मिळवला असून, त्यांना ११४ हा बहुमताचा आकडा गाठण्यासाठी शिंदे गटाच्या २९ नगरसेवकांची मदत अनिवार्य आहे. हीच संधी साधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून भाजपसमोर अडीच-अडीच वर्षांच्या महापौरपदाचा प्रस्ताव ठेवला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातच “जर देवाची इच्छा असेल तर मुंबईचा पुढचा महापौर आपलाच असेल,” असे सूचक वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या या विधानामागे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. शिंदेंच्या नगरसेवकांची मातोश्रीवर फोनाफोनी? ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, शिंदे गटाचे काही नवनिर्वाचित नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासू व्यक्तीला फोन करून, “आमच्या मनात उद्धवजी आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल कोणतेही वैर नाही,” असे स्पष्ट केल्याचे समजते. या गुप्त वाटाघाटींची कुणकुण लागताच उपमुख्यमंत्री शिंदेंनी तातडीने आपल्या नगरसेवकांची रवानगी हॉटेलमध्ये केली असून, महापौर निवडीपर्यंत त्यांना तिथेच ठेवले जाणार आहे. पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडतायत – राऊत दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील आजच्या पत्रकार परिषदेत अनेक सूचक विधाने केली आहेत. ते म्हणाले, “मुंबईचा महापौर शिवसेनेचा किंवा ठाकरे बंधुंचा व्हावा, यापेक्षा भाजपचा होऊ नये ही सगळ्यांची भावना आहे. देवाची इच्छा असेल, शिवसेनेचा महापौर बसू शकतो, असे उद्धव ठाकरे यांनी काल सांगितले. काल मी सकाळी राज ठाकरेंची भेट घेतली. दोन्ही भावांमध्ये मोबाईलवरून चर्चा झाली. अनेकांशी चर्चा सुरू आहे. आम्ही सध्या तटस्थपणे या सगळ्या हालचालींकडे पाहत आहोत, पण पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत आहे,” असा दावा संजय राऊत यांनी केला. कोंडून ठेवले तरी संदेश येतातच संजय राऊत म्हणाले, “शिंदे गटातील निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये बरेच नवीन चेहरे आहेत. ते मूळचे शिवसैनिकच आहेत. शिवसैनिकाच्या मनात मुंबईबद्दल वेगळी भावना आहे. त्यामुळे भाजपचा महापौर होऊ देऊ नये, असे सगळ्यांच्या मनात विचार असल्याचे आमच्या लक्षात आलेले आहे. नगरसेवकांना कितीही कोंडून ठेवले, तरी संपर्काची अनेक साधने असतात, त्यानुसार संदेश येतच असतात.”

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!