पाणीटंचाई:तोडणीच्या तोंडावर विहिरींनी गाठला तळ; मिरची उत्पादक शेतकरी संकटात

सिल्लोड तालुक्यातील अजिंठा, अनाड, पिंपळदरी, बाळापूर, मुकपाठ, गोळेगाव, धोत्रा, पानवडोद, शिवना, पानस, डिग्रस, सराटी, बोदवड, लिहाखेडी, खंडाळा, वसई व जळकी परिसरातील शेतकऱ्यांनी यंदा पारंपरिक पिकांना फाटा देत मोठ्या आशेने मिरची व आले पिकांची लागवड केली. मात्र, विहिरींनी तळ गाठल्याने मिरची उत्पादक शेतकऱ्यांवर संकटाचे ढग दाटले आहेत. एप्रिल-मे महिन्याच्या सुरुवातीला लागवड केलेले मिरची पीक आता काही दिवसांत तोडणीस येणार आहे. शेतात हिरवीगार मिरची बहरली असून बाजारपेठेत माल पाठवण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. मात्र, ऐन तोडणीच्या तोंडावर विहिरी कोरड्या पडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मिरची लागवडीसाठी मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन, महागडी औषधे, खते, मजुरी यावर एकरी लाखो रुपयांचा खर्च झाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून हे पीक उभे केले आहे. आता हातात पैसे येण्याची वेळ आली असताना पाणीटंचाईमुळे सर्व मेहनत वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. जमिनीतील पाण्याची पातळी झपाट्याने घसरल्याने अनेक विहिरी व बोअरवेलचे पाणी आटले आहे. काही ठिकाणी बोअरवेलमधून अवघा अर्धा ते एक तासच पाणी उपलब्ध होत असल्याने पिकांना पुरेसे पाणी देणे अशक्य बनले आहे. परिणामी मिरचीची पाने कोमेजणे, फुलगळ होणे, फळांवर डाग पडण्याचे प्रमाण वाढले आहे. पाणीटंचाईमुळे उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली असून अनेक शेतकरी रात्री-अपरात्री वीज उपलब्ध होताच पाणी देण्यासाठी धाव घेत आहेत. काही शेतकरी खासगी टँकरद्वारे पाणी आणून उभी पिके वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, हजारो रुपयांचा अतिरिक्त खर्च सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. जमिनीतील पाण्याची पातळी झपाट्याने घसरल्याने परिसरातील अनेक विहिरी कोरड्या पडल्या आहेत. काही ठिकाणी बोअरवेलमधून अवघा अर्धा ते एक तासच पाणी मिळत असल्याने पिकांना पाणीपुरवठा करणे कठीण झाले आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे मिरचीची पाने कोमेजत असून फुलगळ वाढली आहे. वेळेत पाणी मिळाले नाही तर उत्पादनावर मोठा परिणाम होऊ शकतो, असे मुकपाठ येथील शेतकरी रणजिंत सूर्यवंशी यांनी सांगितले. मागील वर्षाच्या तुलनेत मिरचीची लागवड वाढली सिल्लोड तालुक्यात मिरची व आले लागवडीत मोठी वाढ झाली आहे. मागील वर्षी मिरचीची ४ हजार हेक्टरवर लागवड करण्यात आली होती. यंदा १० हजार हेक्टरवर मिरचीची लागवड करण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या मते, यंदा मिरची लागवड क्षेत्र १५ हजार हेक्टरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. मिरचीचे पीक वाचवणे हे शेतकऱ्यांसाठी एक आव्हान Ãकमी पावसात किंवा पाण्याच्या टंचाईत मिरचीचे पीक वाचवणे आणि त्याचे नुकसान टाळणे हे एक मोठे आव्हान असते. अशा परिस्थितीत झाडातील ओलावा टिकवून ठेवणे आणि पाण्याचे योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. ​आच्छादन, ठिबक सिंचन, बाष्पीभवन रोखण्यासाठी फवारणी-​पोटॅशियम नायट्रेट, खत आणि कीड व्यवस्थापन, युरियाचा वापर टाळा, सेंद्रिय खते, आंतरमशागत कमी करणे, मिरचीचे पीक कमी पाण्यात वाचवण्यासाठी या उपाययोजनांचा वापर करा. -भोलेनाथ सूर्यवंशी , सहायक कृषी अधिकारी, पिंपळदरी

Leave a Comment

error: Content is protected !!