शिंदेंचा पाठिंबा घेण्याएवढे वाईट दिवस आले नाहीत:आमचा जीव सत्तेसाठी तडफडत नाही, राऊतांनी स्पष्ट केली ठाकरे गटाची भूमिका

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंसोबत कोणत्याही प्रकारच्या युतीची शक्यता जोरकसपणे फेटाळून लावली आहे. आम्ही शिंदेंचा पाठिंबा घेणार नाही. एवढे वाईट दिवस शिवसेनेवर आले नाहीत. सत्ता मिळाली नाही म्हणून आमचा जीव तडफडत नाही, कळवळत नाही. त्यांनी पैशांचा वापर करून निवडणुका लढल्या व जिंकल्या. हा काही बाळासाहेबांचा विचार नव्हता. बाळासाहेब म्हणायचे की, यांच्यापेक्षा वेश्या परवडल्या, असे ते म्हणाले. भास्कर जाधव यांनी शुक्रवारी मुंबईत शिवसेनेचा महापौर बसवण्यासाठी एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी वरील भूमिका व्यक्त केली आहे. ते आज दुपारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले आहे. देशभरातून सर्वच मान्यवरांनी आजच्या दिवसानिमित्त आपले शुभसंदेश पाठवले आहेत. मोदी शिंदेंकडून ऊर्जा, प्रेरणा, मार्गदर्शन घेत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेबांसोबतचा स्वतःचा फोटो ट्विट करून बाळासाहेब आपले कसे मार्गदर्शक होते, आम्ही त्यांच्यापासून कशी प्रेरणा घेतली, आम्हाला त्यांच्यापासून कशी ऊर्जा मिळाली, त्यांनी देशाला व महाराष्ट्राला कशी दिशा दाखवली अशा प्रकारची भूमिका शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहताना मांडली. त्याच मोदींनी त्याच बाळासाहेबांची शिवसेना तोडली, फोडली व शिवसेनाप्रमुख पदावर एकनाथ शिंदे नामक व्यक्तीला बसवले. आता मोदी एकनाथ शिंदेंकडून ऊर्जा, प्रेरणा, मार्गदर्शन घेत आहेत. संजय राऊत म्हणाले, बाळासाहेब एक महान व्यक्तिमत्त्व होते. लोकमान्य टिळकांनंतर लोकमान्य असलेले बाळासाहेब ठाकरे होते. आज सायंकाळी शिवसेनेचा षण्मुखानंद सभागृहात एक कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा उपस्थित राहणार आहे. बाळासाहेबांनी महाराष्ट्राला व देशाला फार मोठा विचार दिला. तो म्हणजे एकजुटीचा. मग तो मराठी माणूस असेल किंवा हिंदू असेल. ऐक्याची वज्रमुठ ही कोणत्याही संकटाशी सामना करू शकते व त्यांनी ते दोन्ही ठिकाणी करून दाखवले. बाळासाहेबांनी सामान्यातील सामान्य माणसाला शूरवीर बनवले. त्यांना न्याय, हक्क व कर्तव्य याची जाणीव करून दिली. अशा बाळासाहेबांचे स्मरण आमच्यासारख्या सदैव होत असते. महाराष्ट्राला त्यांचे विस्मरण कधीच होणार नाही. भास्कर जाधवांच्या विधानावर काय म्हणाले राऊत? भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदेंपुढे युतीचा प्रस्ताव ठेवला आहे. संजय राऊत यावर भाष्य करताना म्हणाले, पक्ष या प्रकरणी योग्य तो निर्णय घेईल. भाजप कोणत्याही परिस्थितीत महापौर पद सोडणार नाही. ते शिवसेनाप्रमुखांचे फोटो राजकीय स्वार्थीसाठी वापरतात. तसे नसते तर त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना फोडली नसती. ज्या बाळासाहेबांनी भाजपचे अस्तित्व महाराष्ट्रात निर्माण केले. त्याच बाळासाहेबांचा पक्ष तुम्ही फोडलात व शिवसेनेशी काडीमात्र संबंध नसलेल्या एका व्यक्तीच्या हातात ठेवलात. बाळासाहेबांचा धनुष्यबाण तुम्ही नामर्दाच्या हातात दिला. अशा भाजपकडून कोणतीही अपेक्षा करणे चुकीचे आहे. आमच्यावर एवढे वाईट दिवस आले नाहीत संजय राऊत म्हणाले, आम्ही शिंदेंचा पाठिंबा घेणार नाही. एवढे वाईट दिवस शिवसेनेवर आले नाहीत. सत्ता मिळाली नाही म्हणून आमचा जीव तडफडत नाही. आम्ही कळवळत नाही. भाजपला सत्तेची राक्षसी हाव सुटली आहे. ते तुम्हाला दिसत आहे. ज्या पद्धतीने त्यांनी पैशाचा वापर करून निवडणुका लढल्या व जिंकल्या. हा काही बाळासाहेबांचा विचार नव्हता. बाळासाहेब असे म्हणायचे की, यांच्यापेक्षा वेश्या परवडल्या.

Leave a Comment

error: Content is protected !!