बातमी ऐका (Marathi Voice Reader)
जंगलातील अन्नाचा शोध घेत मानवी वस्तीत शिरलेल्या एका निष्पाप चितळाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज शनिवारी (ता.२४) लाखांदूर शहरात घडली. निसर्गाच्या साखळीतील हा सुंदर प्राणी अन्नाच्या शोधात थेट शहरात पोहोचला, मात्र त्याचे नशीब बलवत्तर नव्हते. शनिवारला सकाळी ११ वाजेच्या सुमारास लाखांदूर शहरातील वॉर्ड क्रमांक १२ मध्ये ही घटना उघडकीस आली. प्राप्त माहितीनुसार स्थानिक रहिवासी मुक्ताबाई रमेश देसाई यांच्या घरासमोरील अंगणात एक चितळ मृतावस्थेत पडून असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. भर वस्तीत चितळ मृतावस्थेत आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी विलंब न करता लाखांदूर वन विभागाला पाचारण केले. वनविभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृत चितळाचा पंचनामा करून देह ताब्यात घेतला आणि पुढील प्रक्रियेसाठी वन विभागाच्या कार्यालयात नेले. या प्रकरणाचा सखोल तपास वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चन्ने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. चितळाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? तो नैसर्गिक आहे की अन्य काही कारणाने, हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. शहरात वन्यप्राणी आल्याची आणि त्याच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे मृत चितळाला पाहण्यासाठी वॉर्ड क्रमांक १२ मध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अन्नाच्या शोधात या मुक्या प्राण्याला जीव गमवावा लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.