एका माथेफिरू तरुणाने खासगी शिकवणीला जाणाऱ्या 2 अल्पवयीन विद्यार्थिनींना विहिरीत फेकून दिल्याची भयंकर घटना जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात घडली आहे. सदर तरुणाने या मुलींना विहिरीत का फेकले? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतले आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील साकरी गावात ही घटना घडली आहे. रोहन चौधरी असे आरोपी माथेफिरू तरुणाचे नाव आहे. पीडित मुली इयत्ता 9 वीच्या विद्यार्थिनी आहेत. त्या मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे गावातून खासगी शिकवणीसाठी जात होत्या. त्या गावाजवळील एका शेतालगत पोहोचल्या असता तिथे दबा धरून बसलेल्या आरोपीने या दोघींवर हल्ला केला. त्याने त्यांना पकडून एका विहिरीजवळ नेले. त्यानंतर त्यांना पकडून विहिरीत फेकून दिले. हा प्रकार घडत असताना मुलींनी जिवाच्या आकांताने आरडाओरडा केला. त्यांचा आरडाओरडा ऐकूण दुसऱ्या एका शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांचे लक्ष त्यांच्याकडे गेले. त्यानी हातातील काम सोडून त्यांच्या दिशेने धाव घेतली. त्यांनी गावातही ही गोष्ट कळवली. त्यानंतर गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तत्काळ मुलींना दोरखंड व शिडीच्या मदतीने विहिरीबाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. हे वृत्त लिहीपर्यंतही त्यांचा प्रयत्न सुरू होता. पोलिसांनी आरोपी तरुणाला घेतले ताब्यात दुसरीकडे, या घटनेची माहिती मिळताच भुसावळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आरोपी रोहन चौधरी याला ताब्यात घेतले आहे. ते त्याची कसून चौकशी करत आहेत. सदर तरुणाने मुलींना विहिरीत फेकण्याचे विकृत पाऊल का उचलले? हे अद्याप समजले नाही. पण हे प्रकरण जुन्या वादातून घडले का की एकतर्फी प्रेम किंवा इतर कारणांतून घडली? आदी सर्वच अंगाने या प्रकरणाचा तपास केला जात आहे. हे ही वाचा… पुण्यात आईने पोटच्या मुलाचा गळा चिरला:मुलीवरही चाकूने सपासप वार, मुलगा ठार, मुलगी गंभीर; कौटुंबीक वादातून घटना घडल्याचा संशय
पुण्याच्या वाघोली परिसरात एका महिलेने आपल्या पोटच्या मुलाची चाकूने गळा कापून हत्या केल्याची भयंकर घटना उजेडात आली आहे. या घटनेत एक 11 वर्षीय मुलगा ठार झाला असून, त्याची बहीण गंभीर जखमी झाली आहे. कौटुंबीक वादातून महिलेने हे कृत्य केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. वाचा सविस्तर
