छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले असून आता महापौर आणि गटनेतापदासाठी हालचालींना वेग आला आहे. भाजपकडून गटनेता निवडीसाठी बैठक आयोजित करण्यात आली असून चर्चेनंतर नावे प्रदेश कार्यकारिणीकडे पाठवली जाणार आहेत. मंगळवार, 27 जानेवारीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती भाजप शहराध्यक्ष किशोर शितोळे यांनी दिली. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत भाजपचे एकूण 57 नगरसेवक निवडून आले असून, महापौरपदावर भाजपचाच दावा आहे. गटनेता निवडीसाठी आज बैठक आयोजित करण्यात आली असून, या बैठकीत विविध नावांवर चर्चा केली जात आहे. या चर्चेनंतर निवडलेली नावे भाजप प्रदेश कार्यकारिणीकडे पाठवण्यात येणार असून, अंतिम निर्णय मंगळवार, 27 जानेवारीपर्यंत होईल, असे शहराध्यक्ष किशोर शितोळे यांनी सांगितले. महापौरपदासाठी सर्वसाधारण गटातील उमेदवारालाच प्राधान्य देण्यात येईल, असे स्पष्ट करत शितोळे म्हणाले की, सध्या सर्वसाधारण गटातील तब्बल 12 नावे चर्चेत आहेत. ही सर्व नावे अनुभवी आणि शहरासाठी चांगले काम करणारी असल्याने एका नावावर शिक्कामोर्तब करणे पक्षासाठी आव्हानात्मक ठरणार आहे. तिकीट वाटपाच्या वेळी काही ठिकाणी ओढाताण झाली असल्याची कबुली देत शितोळे म्हणाले की, ज्या जागा ज्या गटासाठी राखीव होत्या, त्या तत्त्वानुसार उमेदवार द्यायचा निर्णय होता. मात्र काही ठिकाणी निवडणूक जिंकणे महत्त्वाचे असल्याने ओपन जागांवर इतर गटातील उमेदवार देण्यात आले. यामुळे पक्षांतर्गत नाराजी असल्याचेही त्यांनी मान्य केले. ही नावे आहे चर्चेत किशोर शितोळे म्हणाले की, विजय औताडे, राजगौरव वानखेडे, शिवाजी दांडगे, समीर राजूरकर, महेश माळवतकर, रामेश्वर भादवे, सुरेंद्र कुलकर्णी अशी सक्षम नावे आहेत. प्रत्येक जण अनुभवी नगरसेवक आहे, यातून एका जणाला संधी देणं हे खूप टफ काम आहे. एक लाखाच्या खुर्चीत बसणार नवनिर्वाचित महापौर दुसरीकडे शहराला 23 वा महापौर मिळणार असून तो भाजपचा असणार हे निश्चित झाले. महापौर दालनाचे नूतनीकरण पूर्ण झाले आहे. या दालनात दिल्लीहून खास खुर्ची मागवण्यात आली आहे. या खुर्चीची किंमत 80 हजार ते 1 लाख रुपयांदरम्यान आहे. ही खुर्ची लाखमोलाची ठरणार आहे. त्यामुळे या खुर्चीत कोण बसणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. राज्यातील कोणत्याही महापालिकेत नसलेले अत्याधुनिक सभागृह तयार करण्यात आले आहे. महापौर दालनाला कॉर्पोरेट लूक देण्यात आला आहे. महापौरांसाठी खास खुर्ची मागवण्यात आली आहे. या खुर्चीत विश्रांती घेण्याचीही सुविधा आहे. दहा ते वीस मिनिटे विश्रांती घेता येईल, अशी रचना आहे.
मूलभूत समस्या सोडवण्याच्या अपेक्षा पाच वर्षांनंतर शहराला महापौर मिळणार आहे. नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. पाणीपट्टी न वाढवता मुबलक पाणी मिळावे, गुंठेवारी प्रक्रिया सुलभ व्हावी, अतिक्रमणांनंतर भूसंपादन करून मोबदला मिळावा, अशी मागणी आहे. त्यामुळे नव्या महापौरांची चांगलीच दमछाक होणार आहे. हे लक्षात घेऊन प्रशासनाने ही विशेष खुर्ची मागवली आहे.
