Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

राज ठाकरेंच्या शिसारी विधानानंतर राजू पाटलांनी सांगितले युतीमागचं खरं कारण:पक्षाचे नगरसेवक वाचवण्यासाठीच शिंदेंना साथ

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील राजकीय समीकरणांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलेल्या नाराजीनंतर आता मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राज ठाकरेंनी अशा राजकारणामुळे शिसारी येते, असे म्हणत अप्रत्यक्षपणे मनसे-शिंदेसेना युतीवर टीका केल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र राजू पाटील यांनी ही युती कोणत्याही स्वार्थासाठी नव्हे, तर पक्षहितासाठी आणि नगरसेवकांचे राजकीय संरक्षण करण्यासाठीच करण्यात आल्याचे ठामपणे सांगितले आहे. आपली भूमिका साहेबांना आधीच कळवली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि भाजपने एकत्र निवडणूक लढवली होती. मात्र निकाल जाहीर होताच शिंदे गटाने भाजपला बाजूला ठेवत मनसेसोबत हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला. मनसेचे पाच नगरसेवक आणि शिंदेसेनेच्या संख्याबळाच्या जोरावर महापौरपदावर दावा करण्यात आला. या घडामोडींवर राज ठाकरे यांनी 23 जानेवारी रोजी षण्मुखानंद सभागृहातील भाषणात तीव्र शब्दांत भाष्य केले. आजच्या राजकारणात माणसांचा लिलाव सुरू असल्याची खंत व्यक्त करत, अशा चित्रामुळे शिसारी येते, असे त्यांनी जाहीर सभेत सांगितले होते. हिंदुत्त्वाचा बाजार मांडला जात असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. राज ठाकरेंच्या या विधानानंतर मनसे-शिंदेसेना युतीबाबत पक्षात अस्वस्थता असल्याचे चित्र निर्माण झाले. मात्र यावर उत्तर देताना राजू पाटील यांनी वेगळाच दृष्टिकोन मांडला. भाजपकडून मनसेच्या नगरसेवकांना पक्षात घेण्यासाठी फोन येऊ लागले होते, असा गंभीर दावा त्यांनी केला. दबाव किंवा आमिष दाखवून नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न होऊ शकतो, ही शक्यता लक्षात घेऊनच आपण तातडीने पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले. माझ्या पक्षाचे नगरसेवक सुरक्षित राहावेत, त्यांच्यावर अन्याय होऊ नये, यासाठीच मी त्यांना बाजूला घेतले, असे राजू पाटील म्हणाले. पुढील काळात मनसेची भूमिका काय राहणार आपण घेतलेला निर्णय पूर्णपणे पक्षहिताचा असून, याबाबत राज ठाकरे यांना आधीच माहिती दिली होती, असा दावाही राजू पाटील यांनी केला. मी काय केलं याबाबत मी माझ्या साहेबांना कळवलं होतं. माझा हेतू स्वच्छ होता. बाकी लोक काय म्हणतात, याने मला काही फरक पडत नाही, असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीतील मनसे-शिंदेसेना युती ही राजकीय मजबुरीतून आणि सावधगिरी म्हणून झाल्याचे राजू पाटील यांचे स्पष्टीकरण आहे. मात्र राज ठाकरेंच्या विधानामुळे या युतीभोवतीचे राजकारण अधिकच तापले असून, पुढील काळात मनसेची भूमिका काय राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!