सुरेश पाचभाई | मारेगाव
मारेगाव : दुर्गमतेशी झुंज देत, अडचणींवर मात करत आणि माणुसकीचा धागा घट्ट धरून सेवा हीच साधना या तत्त्वावर कार्यरत असलेल्या साई मित्र परिवारच्या रुग्णवाहिकेला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. आदिवासीबहुल मारेगाव तालुक्यात गेल्या दोन वर्षांपासून ही रुग्णवाहिका शेकडो गरजू, गोरगरीब व असहाय्य नागरिकांसाठी आशेचा आणि विश्वासाचा आधार ठरत आहे.
डोंगरदऱ्या, जंगलपरिसर, गावपाडे आणि दुर्गम वस्ती यांमुळे मारेगाव तालुक्यात वेळेवर आरोग्यसेवा मिळवणे आजही मोठे आव्हान आहे. अशा परिस्थितीत साई मित्र परिवारने समाजाची गरज ओळखून सुरू केलेली रुग्णवाहिका अपघातग्रस्त रुग्ण, अचानक आजारी पडलेले नागरिक तसेच प्रसूतीसाठी महिलांना तातडीने रुग्णालयात पोहोचवण्याचे मोलाचे कार्य बजावत आहे.
पावसाळ्यात चिखलात रुतलेले रस्ते, अंधाऱ्या रात्री, अरुंद जंगलवाटा आणि प्रतिकूल परिस्थितीची कोणतीही तमा न बाळगता ही रुग्णवाहिका प्रत्येक हाकेला तत्काळ धाव घेत असल्याचे चित्र आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी ही सेवा केवळ मदत न राहता जीवदान ठरत असून, अनेक वेळा अमूल्य प्राण वाचविण्यात तिचा निर्णायक वाटा राहिला आहे.

“आपली माणसे, आपली जबाबदारी” या भावनेतून साई मित्र परिवारचे सदस्य स्वतःच्या सुखसोयी बाजूला ठेवून निःस्वार्थपणे ही सेवा अखंड सुरू ठेवत आहेत. गेल्या दोन वर्षांत या रुग्णवाहिकेने समाजात विश्वासाचे नाते निर्माण केले असून, आपत्कालीन प्रसंगी वेळेवर मदत मिळेल, ही खात्री नागरिकांच्या मनात दृढ झाली आहे.
गेल्या १५ वर्षांपासून साई मित्र परिवार विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांमध्ये सक्रिय आहे. कोरोना महामारीच्या कठीण काळातही संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत गरजूंना मदतीचा हात दिला होता. गरजू रुग्णांना तातडीची वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने रुग्णवाहिका जनतेच्या सेवेत उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यासोबतच रक्ताची कमतरता भासू नये यासाठी नियमित रक्तदान शिबिरांचे आयोजनही करण्यात येत आहे.
रुग्णवाहिकेच्या दोन वर्षांच्या सेवेकडे केवळ कालमर्यादा म्हणून न पाहता, तो सेवाभाव, समर्पण आणि माणुसकीचा प्रवास मानला जात आहे. भविष्यातही ही सेवा अधिक व्यापक स्वरूपात सुरू राहावी, अशी अपेक्षा नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि लाभार्थी व्यक्त करत आहेत.
