अजित पवारांच्या विमान अपघातानंतर डीजीसीए अर्थात नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने व्हीआयपी व्यक्तीच्या हवाई प्रवासाच्या सुरक्षेविषयी नव्या गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या गाईडलाईन्सवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. डीजीसीएने व्हीएसआर कंपनीसह संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाी केली तर नव्या गाईडलाईन्सला अर्थ आहे, अन्यथा त्या केवळ एक दिखावा ठरतील, असे त्यांनी म्हटले आहे. अजित पवार यांचे गत 28 जानेवारी रोजी बारामती येथील एका विमान अपघातात निधन झाले. तेव्हापासून रोहित पवार या प्रकरणी व्हीएसआर विमान कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. या अपघातानंतर डीजीसीएने महत्त्वाच्या व्यक्तीच्या विमान प्रवासाच्या सुरक्षेविषयी नवी गाईडलाईन्स जाहीर केली आहे. त्यावर रोहित पवारांनी निशाणा साधला आहे. ते म्हणाले, अजितदादांच्या दुर्दैवी अपघातानंतर VSR सारख्या कंपन्यांनी नियमांचे केलेले उल्लंघन यांसारख्या अनेक बाबी पुढे आल्या. या सर्व बाबींचा विचार करून DGCA ने महत्वाच्या व्यक्तीच्या प्रवासावेळेस सुरक्षेसाठीच्या नव्या गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत. काहीतरी करतोय हे दाखवण्याचा प्रयत्न
2014 च्या तुलनेत 2026 च्या नव्या गाईडलाइन्स थोड्या विस्तृत असल्या तरी आधीच्या गाईडलाइन्समध्ये थोडेफार फेरबदल करून काहीतरी करतोय, हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. YSR रेड्डी यांच्या दुर्दैवी अपघातानंतर 2014 मध्ये अशाच प्रकारच्या गाईडलाईन्स काढल्या होत्या परंतु अधिकारी आणि विमान कंपन्यांचे हितसंबंध यामुळे गाईडलाईन्सची काटेकोरपणे अंमलबजावणी झालीच नाही. परिणामी अपघातही थांबले नाहीत आणि दुर्दैवांने अजितदादांसारख्या लोकनेत्याचा बळी गेला आणि त्यानंतर आता पुन्हा DGCA ला जाग आली. VSR कंपनी, the Accountable Manager, संबंधित सर्व अधिकारी यांनी गाईडलाईन्सचे पालन केलेले नाही. त्यामुळे जुन्या आणि नव्या या दोन्ही गाईडलाइन्समध्ये ज्याप्रमाणे Action Of Non-Compliance सांगितली आहे, त्याप्रमाणे संबंधित कंपनीचा NSOP रद्द करून संबंधित सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. तरच या गाईडलाईन्सला अर्थ आहे, अन्यथा या नव्या गाईडलाइनसुद्धा केवळ एक दिखावा ठरतील, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. ये प्यार और संघर्ष आखिर तक चलता रहेगा अजित पवार यांच्या विमान अपघाताला आज बरोबर 2 महिने पूर्ण झाले. रोहित पवार यांनी या प्रकरणी अधिक त्वेषाने संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आठवणींचे 2 महिने. ये प्यार और संघर्ष आखिर तक चलता रहेगा! मिस यू दादा सो मच, असे त्यांनी म्हटले आहे. दोन महिने लोटले, पण जखम अजूनही ताजीच – मिटकरी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही या प्रकरणी आपल्या भावना प्रकट केल्या आहेत. ते म्हणाले, दोन महिने उलटले… पण जखम अजूनही ताजीच आहे. दादांच्या विमान अपघातानंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला होता, आणि आजही तेच दुःख प्रत्येकाच्या मनात घर करून बसलेलआहे. वेळ पुढे सरकतोय, दिवस बदलत आहेत… पण दादांच्या आठवणी आणि त्यांच्या अचानक जाण्याचं दुःख अजूनही तसंच आहे. राज्यातील लाखो चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न आजही जिवंत आहे – नेमकं काय घडलं? या घटनेमागचं गूढ अजूनही उकललेलं नाही, आणि हीच वेदना प्रत्येकाच्या मनाला सतावत आहे. दादा फक्त एक नेता नव्हते… ते लाखो लोकांच्या आशा-अपेक्षांचं केंद्र होते, एक विश्वास होते. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणारी नाही. आजही महाराष्ट्रातील प्रत्येक दादा समर्थक न्यायाची वाट पाहतोय… सत्य समोर येण्याची वाट पाहतोय. कारण दादांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक हृदयाला एकच अपेक्षा आहे – सत्य बाहेर यावं… आणि दादांना न्याय मिळावा! दोन महिने काळीज चिरणारे 28 जानेवारी ते 28 मार्च, असे मिटकरी यांनी म्हटले आहे.
