विहिरीत उडी घेत युवकाची आत्महत्या
कळंब येथील दुर्दैवी घटना

परिसरात हळहळ; पोलिसांकडून तपास सुरू

कळंब | प्रतिनिधी : नितेश क्षीरसागर

कळंब शहरात एका २२ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना शनिवार, दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली.

हेमंत पंडितराव येंगडे (वय २२, रा. वॉर्ड क्रमांक ३, कळंब) असे मृत युवकाचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार सदर युवकाने आपल्या राहत्या घरासमोरील विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविल्याचे निदर्शनास आले.

घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी तात्काळ कळंब पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने युवकास विहिरीतून बाहेर काढून ग्रामीण रुग्णालय, कळंब येथे दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यास मृत घोषित केले.

या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे कळंब परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृत युवकाच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. मृत युवकाच्या पश्चात आई व एक भाऊ असा आप्त परिवार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!