मान्सूनच्या आगमनामुळे सह्याद्रीच्या पर्वतरांगा हिरव्यागार झाल्या असून, ओढे, नाले आणि धबधबे दुथडी भरून वाहत आहेत. हे विलोभनीय निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक आणि ट्रेकर्स सह्याद्रीकडे आकर्षित होतात. मात्र, पावसाळ्यात अपघातांचे धोकेही मोठ्या प्रमाणावर वाढतात. या पार्श्वभूमीवर, ‘अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघा’ने पर्यटकांसाठी सुरक्षिततेचे आवाहन करत महत्त्वाची मार्गदर्शक नियमावली जाहीर केली आहे. महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे यांनी पर्यटकांना सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड न करण्याचे आवाहन केले आहे. मानवी चुकांमुळे घडणाऱ्या दुर्दैवी घटना टाळणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. पावसाळ्यात सह्याद्रीतील वाटा निसरड्या होतात, दाट धुके, कमी दृश्यमानता, वेगाने वाढणारे पाण्याचे प्रवाह आणि दरडी कोसळण्याच्या शक्यतांमुळे अपघात होऊ शकतात. त्यामुळे अति-साहस टाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी महासंघाने काही सूचना दिल्या आहेत. नेहमी अनुभवी आणि ओळखीच्या ग्रुपसोबतच ट्रेकला जावे. ट्रेकची संपूर्ण माहिती कुटुंबियांना द्यावी आणि जाण्यापूर्वी हवामानाचा अंदाज घ्यावा. सोबत प्रथमोपचार पेटी, टॉर्च, पॉवर बँक, आवश्यक सुरक्षा साहित्य आणि अतिरिक्त कपडे ठेवावेत. मोबाईल व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जलरोधक पिशवीत ठेवावीत. तसेच, गड-किल्ले, ऐतिहासिक वारसा आणि निसर्गाचा आदर राखावा. एकट्याने कोणत्याही अनोळखी किंवा दुर्गम भागात भटकंती करू नये. धबधब्यांच्या वेगाने वाहणाऱ्या प्रवाहात किंवा प्रपाताखाली थेट जाऊ नये. धोकादायक कडे, तटबंदी किंवा बुरुजांवर उभे राहून ‘सेल्फी’ काढू नये. सोशल मीडियावरील प्रसिद्धीसाठी (रिल्स किंवा स्टंट्स) जीव धोक्यात घालू नये. मद्यपान करून किंवा बेफिकीरपणे कोणतेही धाडस करू नये, असे आवाहन महासंघाने केले आहे. गड-किल्ल्यांवर किंवा डोंगराळ भागात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्वरित मदतीसाठी महासंघाच्या ‘महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर’च्या 7620-230-231 या 24 तास कार्यरत असणाऱ्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. ही यंत्रणा राज्यातील डोंगराळ भागातील बचावकार्यासाठी शेकडो प्रशिक्षित स्वयंसेवकांसह सदैव सज्ज आहे. सुरक्षिततेच्या चौकटीत राहूनच पर्यटनाचा आनंद घ्यावा, असे महासंघाने म्हटले आहे.
