Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

शिंदेच्या उमेदवारांना भाजपकडून AB फॉर्मचे वाटप:कार्यकर्त्यांमध्ये संताप, पदाधिकाऱ्यांनी जिल्हाप्रमुखांना विचारला जाब; AUDIO व्हायरल

राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असतानाच, धाराशिवमध्ये महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. शिवसेनेच्या (शिंदे गट) उमेदवारांचे अधिकृत ‘एबी फॉर्म’ भाजप नेत्यांकडून वाटले जात असल्याचा गंभीर आरोप खुद्द शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीच केला आहे. या प्रकारामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड संताप असून, संपर्कप्रमुख राजन साळवी आणि पदाधिकारी अविनाश खापे यांच्यातील संभाषणाची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. या क्लिपने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. येत्या ३ फेब्रुवारीला धाराशिव जिल्हा परिषदेसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेनेच्या उमेदवारांना पक्षाचे अधिकृत फॉर्म (एबी फॉर्म) मिळणे अपेक्षित होते. मात्र, भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे सुपुत्र मल्हार पाटील हे शिवसेनेच्या उमेदवारांना हे फॉर्म आणून देत असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. “शिवसेनेचे निर्णय घेण्याचे अधिकार संपर्कप्रमुखांचे असताना भाजपचा हस्तक्षेप का?” असा सवाल आता विचारला जात आहे. शिवसैनिक म्हणवून घेण्याची लाज वाटतेय व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये पदाधिकारी अविनाश खापे यांचा संताप स्पष्टपणे जाणवत आहे. त्यांनी राजन साळवी यांना थेट जाब विचारताना म्हटले की, “दिवसभर आमच्यासोबत बैठका घेता आणि रात्री राणा पाटलांसोबत चर्चा करून त्यांचे सुपुत्र आम्हाला एबी फॉर्म वाटतात. या प्रकारामुळे आम्हाला आता शिवसैनिक म्हणवून घ्यायची लाज वाटायला लागली आहे.” पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना डावलून भाजपच्या सांगण्यावरून निर्णय घेतले जात असल्याचा आरोप या संभाषणातून समोर आला आहे. राजकारण सोडून घरात बसण्याची वेळ या गोंधळामुळे शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते हतबल झाले आहेत. “आम्ही तानाजी सावंत यांचे वैयक्तिक कार्यकर्ते नाही, पण जिल्ह्यासाठी ते गरजेचे आहेत. मात्र, सध्या जो गोंधळ सुरू आहे, त्यामुळे कार्यकर्ते रडत असून आता राजकारण सोडून घरात बसण्याची वेळ आली आहे,” अशा तीव्र भावना खापे यांनी व्यक्त केल्या. धाराशिव हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात असताना, पक्षाची ही स्थिती का झाली? असा संतप्त सवाल आता तळागाळातील शिवसैनिक विचारत आहेत. बालेकिल्ल्यात निकालावर होणार परिणाम? धाराशिव हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला. इथला शिवसैनिक आक्रमक आहे, पण तो तितकाच स्वाभिमानीही आहे. जेव्हा मित्रपक्षाचा हस्तक्षेप वाढतो आणि स्वतःचे नेते हतबल दिसतात, तेव्हा निष्ठावंत कार्यकर्ता एकतर बंड करतो किंवा राजकारण सोडून शांत बसतो. तानाजी सावंत यांच्यासारखे प्रभावी नेतृत्व जिल्ह्यात असतानाही, जर पक्षाच्या अंतर्गत व्यवहारात दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांची ‘मालकी’ चालत असेल, तर आगामी निवडणुकीत मतपेटीतून या संतापाचा फटका बसण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!