एका विधवा महिलेशी वर्षभर लैंगिक संबंध ठेवून लग्नास नकार देणाऱ्या एका कथित मठाधिपतीच्या नांदेड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पीडित महिला ज्या व्यक्तीला गुरू माणून श्रद्धेने शरण गेली, अखेर त्यानेच तिचा घात केला. या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, पीडित विधवा महिला मे 2025 मध्ये पहिल्यांदा नांदेड शहरातील गाडीपुरा भागातील एका मठात गेली होती. तिथे तिची ओळख हरिगिरी महाराज यांच्याशी झाली. पीडिता दर गुरूवारी मोठ्या श्रद्धेने या मठात दर्शनासाठी येत होती. तिने हरिगिरी महाराजांना आपले गुरू मानले होते. पण या भोंदू महाराजाची तिच्यावर वाईट नजर होती. तो सतत तिला फोन करून आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होता. अखेर त्यात त्याला यश आले. वाढदिवसाच्या दिवशीच केला बलात्कार हरिगिरी महाराजांचा 14 जुलै 2025 रोजी वाढदिवस होता. वाढदिवसाच्या निमित्ताने तो स्वतः पीडित महिलेच्या घरी गेला. तिथेच त्याने पहिल्यांदा महिलेवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर ही बाब कुणालाही न सांगण्यासाठी त्याने महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत त्याने अनेकदा तिच्यावर बलात्कार केला. पण त्यानंतर महिलेने लग्नाचा तगादा लावताच तो तिला टाळू लागला. मी संन्यासी असल्यामुळे लग्न करू शकत नाही, असे म्हणत आपले हात वर करू लागला. यामुळे आपली फसवणूक झाल्याची बाब महिलेच्या लक्षात आली. त्यानंतर तत्काळ तिने पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर झालेल्या चौकशीत पोलिसांनी भोंदू हरिगिरी महाराजाच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलिसांनी हरिगिरी दत्तगिरी महाराजांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तो पोलिसांच्या कोठडीत आहे. नाशिकच्या भोंदू अशोक खरातच्या प्रकरणानंतर नांदेडमध्ये हे प्रकरण समोर आल्यामुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे. काय आहे अशोक खरात प्रकरण? नाशिकच्या अशोक खरात नामक भोंदू बाबाने महिलांना भविष्य सांगण्याच्या बहाण्याने त्यांचे लैंगिक शोषण केले. त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेत. या प्रकरणी सध्या अशोक खरातला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना नुकताच या प्रकरणात राजीनामाही द्यावा लागला आहे. हे ही वाचा… IG दत्तात्रय कराळेंनी अशोक खरातला पाठिशी घातले:तृप्ती देसाई यांचा आरोप; भोंदू खरातचे प्रकरण गतवर्षीपासून दाबले जात असल्याचा दावा
सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी नाशिकचे तत्कालीन आयजी दत्तात्रय कराळे यांच्यावर अशोक खरातला पाठिशी घालण्याचा आरोप केला आहे. अशोक खरात हा दत्तात्रय कराळे यांचा गुरू होता. त्यामुळे ते आपल्या गुरूवर कशी कारवाई करतील? त्यांनीच त्याला पाठिशी घातले, असे त्या म्हणाल्यात. यावेळी त्यांनी भोंदू अशोक खरातचे एन्काउंटर होण्याची भीतीही व्यक्त केली. वाचा सविस्तर
