नाशिकमध्ये महायुतीला दणका! गोकुळ गीतेंचा दणदणीत विजय:क्रॉस व्होटिंगची चर्चा, दराडेंचा संताप, राऊत-महाजन आमनेसामने

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर झाला असून महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. भाजपमधून बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी कायम ठेवणारे गोकुळ गिते यांनी पहिल्याच फेरीत विजयाचा कोटा पार करत दणदणीत विजय मिळवला. या निकालामुळे महायुतीत खळबळ उडाली असून क्रॉस व्होटिंग, अंतर्गत नाराजी आणि विश्वासघाताच्या चर्चांना उधाण आले आहे. निकालानंतर नरेंद्र दराडे यांनी महायुतीतीलच काही नेत्यांवर घात केल्याचा आरोप केला, तर खासदार संजय राऊत यांनी “आमच्या मतदारांनी शिंदे गटाच्या उमेदवाराविरोधात मतदान केले” असा दावा केला. दुसरीकडे मंत्री गिरीश महाजन यांनी पराभव धक्कादायक असल्याचे मान्य करत कारणांचा शोध घेतला जाईल, असे स्पष्ट केले आहे. पहिल्याच फेरीत गोकुळ गितेंचा विजय या निवडणुकीत एकूण ६१८ मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी १३ मते अवैध ठरल्याने ६०५ मते वैध मानण्यात आली. विजयासाठी ३०३ मतांचा कोटा आवश्यक होता. मतमोजणीत गोकुळ गितेंना तब्बल ३५७ मते मिळाली, तर महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना केवळ २४८ मतांवर समाधान मानावे लागले. आणखी एक उमेदवार प्रसाद हिरे यांना एकही मत मिळाले नाही. त्यामुळे पहिल्याच फेरीत गोकुळ गितेंचा विजय निश्चित झाला. माघार घेतल्याची घोषणा, पण छुपा प्रचार सुरूच? गोकुळ गिते हे सुरुवातीपासूनच या निवडणुकीतील चर्चेचे केंद्र होते. मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गितेंनी बंडखोरी करत उमेदवारी कायम ठेवली होती. गिरीश महाजन, उदय सामंत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. शेवटी त्यांनी प्रचार करणार नसल्याचे जाहीर केले. मात्र त्यांच्या समर्थकांकडून छुप्या पद्धतीने प्रचार सुरू असल्याची चर्चा आधीपासूनच होती. निकालानंतर त्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. मतमोजणीपूर्वीच विजयाचा दावा मतमोजणी सुरू होण्यापूर्वी गोकुळ गिते केंद्रावर पोहोचले होते. त्यावेळी त्यांनी, “मी प्रचार केला नसला तरी माझ्या कार्यकर्त्यांनी प्रचार केला आहे. मीच विजयी होणार,” असा विश्वास व्यक्त केला होता. निकालानंतर त्यांचा हा दावा खरा ठरला. मतमोजणी केंद्रात मोठा गोंधळ मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच केंद्रात तणाव निर्माण झाला होता. नरेंद्र दराडे यांचे बंधू आणि विद्यमान आमदार किशोर दराडे हे मतमोजणी केंद्रात प्रतिनिधी म्हणून उपस्थित असल्याबद्दल गोकुळ गितेंनी आक्षेप घेतला. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार विद्यमान लोकप्रतिनिधींना प्रतिनिधी म्हणून बसण्याची परवानगी नसल्याचा दावा करत गितेंनी वकिलांना बोलावले. यानंतर दोन्ही बाजूंच्या समर्थकांमध्ये शाब्दिक चकमक झाली आणि काही काळ मतमोजणी प्रक्रिया ठप्प झाली. नंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि पोलिसांच्या बंदोबस्तात मतमोजणी पुन्हा सुरू झाली. पराभवानंतर दराडेंचा संताप पराभव स्पष्ट होताच नरेंद्र दराडे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. महायुतीतीलच अनेक नेत्यांनी आपला घात केल्याचा आरोप त्यांनी केला. “एकनाथ शिंदे यांना सोडले तर महायुतीतील इतर सर्वांनी माझा विश्वासघात केला,” असे ते म्हणाले. निकालानंतर मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष करणाऱ्या गोकुळ गितेंच्या समर्थकांवरही ते संतापल्याचे दिसून आले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ‘पावणे पाचशे मते असताना अडीचशेच कशी मिळाली?’ – गिरीश महाजन निकालानंतर मंत्री गिरीश महाजन यांनीही प्रतिक्रिया देताना पराभव धक्कादायक असल्याचे मान्य केले. महाजन म्हणाले, “नाशिकमधील आमचा पराभव निश्चितच धक्कादायक आहे. आमच्या बाजूने कोण उभं राहिलं नाही, याची कारणं तपासली जातील. आमच्याकडे पावणे पाचशे मतांचे संख्याबळ असताना महायुतीच्या उमेदवाराला अवघी अडीचशे मते मिळाली. त्यामुळे नेमकं काय घडलं याचा शोध घेतला जाईल.” दराडेंच्या आरोपांवर महाजनांचे प्रत्युत्तर नरेंद्र दराडे यांनी पराभवानंतर केलेल्या आरोपांबाबत बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, “पराभव झाल्यानंतर दराडे सध्या वेगळ्या मानसिक अवस्थेत आहेत. अशा प्रकारचे आरोप करणे योग्य नाही. एकमेकांवर आरोप करणे हे आमच्या रक्तात नाही.” महाजनांच्या या वक्तव्यामुळे महायुतीकडून नुकसान नियंत्रणाचा प्रयत्न सुरू असल्याचे मानले जात आहे. ‘आमच्या मतदारांनी शिंदे गटाविरोधात मतदान केले’ – संजय राऊत निकालानंतर पत्रकार परिषदेत बोलताना खासदार संजय राऊत यांनी या विजयाला वेगळे राजकीय परिमाण दिले. राऊत म्हणाले की, नाशिकमधील अनेक मतदारांनी शिंदे गटाच्या उमेदवाराविरोधात मतदान केले. हा निकाल जनतेच्या मनातील नाराजीचे प्रतीक आहे आणि राज्यातील बदलत्या राजकीय वातावरणाचा संदेश देणारा आहे. राऊतांच्या दाव्यावर महाजनांचा पलटवार संजय राऊत यांच्या दाव्याबाबत विचारले असता गिरीश महाजन यांनी तो फेटाळून लावला. “संजय राऊत जे बोलत आहेत, त्यात कोणतेही तथ्य नाही,” असे स्पष्ट शब्दांत महाजन यांनी सांगितले. क्रॉस व्होटिंगची चर्चा अधिक तीव्र नाशिकमधील संख्याबळाचा विचार करता महायुतीचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता. मात्र प्रत्यक्ष निकालात अधिकृत उमेदवाराचा मोठ्या फरकाने पराभव झाल्याने क्रॉस व्होटिंग झाल्याची चर्चा अधिक तीव्र झाली आहे. विशेषतः भाजप आणि महायुतीच्या काही मतदारांनी गोकुळ गितेंना मतदान केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे हा पराभव केवळ एका उमेदवाराचा नसून महायुतीतील अंतर्गत मतभेदांचे प्रतिबिंब असल्याचे बोलले जात आहे. महायुतीसमोर आत्मपरीक्षणाचे मोठे आव्हान नाशिक विधान परिषद निवडणुकीचा निकाल हा राज्यातील सत्ताधारी महायुतीसाठी गंभीर इशारा मानला जात आहे. अधिकृत उमेदवाराचा पराभव, बंडखोर उमेदवाराचा विजय, मतमोजणीतील गोंधळ, पराभवानंतरचे आरोप-प्रत्यारोप आणि क्रॉस व्होटिंगच्या चर्चा यामुळे महायुतीसमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि राज्यातील पुढील राजकीय लढतींच्या पार्श्वभूमीवर नाशिकचा हा निकाल दूरगामी परिणाम करणारा ठरू शकतो, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!