Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

भाजपात आले, ‘पवित्र’ झाले!, नगरसेवकांना मार्गदर्शन..:सोलापूर मनपा गटनेता निवडीसाठी बुधवारी 86 जण एकत्रित पुण्याला जाणार

मनपा निवडणुकीत भाजपचे 102 पैकी 87 उमेदवार विजयी झाले. त्यापैकी 35 जण हे दुसऱ्या पक्षातून आयात केलेले आहेत. त्यामुळे आता महापौर, उपमहापौरपद, स्थायी समिती अध्यक्षपद, स्वीकृत नगरसेवकपदी आयात केलेल्यांची वर्णी लागणार की निष्ठावंतांना न्याय देणार? अशी चर्चा सुरू झाली आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांना पत्रकारांनी शनिवारीच हा प्रश्न विचारला असता त्यांनी आयाराम व निष्ठावंत असा भेदच राहिला नसल्याचे सुचित केले. गोरे म्हणाले, ‘आयाराम- गयाराम असा कुणाचाही उल्लेख करू नये. हे सर्व जण भाजपचे सदस्यत्व स्वीकारून निवडून आलेत. त्यामुळे त्यांच्याविषयी आदरपूर्वक बोलावे. साधन शुचिता पाळा.’ भाजपात आता महापौर, गटनेता निवडीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शनिवारी सकाळी डफरीन चौकातील सारस्वत मंगल कार्यालयात नूतन नगरसेवकांची बैठक झाली. भाजपचे 87 नगरसेवक आहेत. मात्र शालन शिंदे या खून प्रकरणात सहभागाच्या संशयावरून कोठडीत आहेत. त्यामुळे 86 नगरसेवकच बैठकीस हजर होते. दोन्ही आमदार देशमुख मात्र या वेळी हजर नव्हते. नगरसेवकांना मार्गदर्शन करताना‎ पालकमंत्री म्हणाले,‘महापौर व इतर‎ पदाधिकाऱ्यांच्या निवडीचा निर्णय ‎पक्ष पातळीवर होणार आहे. त्यामुळे ‎इच्छुकांनी या बाबत कुठेही ‎प्रतिक्रिया देऊ नयेत. पुण्याच्या ‎विभागीय आयुक्त कार्यालयात सर्व ‎86 नगरसेवकांना घेऊन जाऊन तिथे ‎गटनोंदणी होणार आहे. बुधवारी‎(28 जानेवारी) रोजी दोन‎ ट्रॅव्हल्समधून हे सर्व नगरसेवक‎ एकत्रितच पुण्याला जातील व तिथे‎ सर्व प्रक्रिया पार पाडली जाईल,’‎अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या ‎आहेत. दरम्यान, बुधवारीच‎ भाजपचा गटनेता ठरेल व त्यांचे नाव‎ आयुक्त कार्यालयात सादर केले‎ जाईल. माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे‎ यांच्याकडे ही जबाबदारी‎ सोपवण्याच्या हालचाली सुरु‎ असल्याचे सूत्रांनी सांगितले.‎ दोन्ही आमदार देशमुख, किरण ‎देशमुख गैरहजर… मनपा‎ निवडणुकीत भरीव यश‎ मिळाल्यानंतरही भाजपमधील ‎अंतर्गत संघर्ष व मानापमान नाट्य ‎संपलेले नाही. पालकमंत्र्यांच्या‎ उपस्थितीत झालेल्या बैठकीस ‎शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर,‎ आमदार देवेंद्र कोठे, माजी आमदार ‎दिलीप माने, मनीष देशमुख हे प्रमुख‎ नेते उपस्थित होते. शहरातील दोन ‎ज्येष्ठ आमदार विजयकुमार‎ देशमुख व सुभाष देशमुख यांची‎ मात्र गैरहजेरी होती. विशेष म्हणजे ‎विजयकुमार देशमुख यांचे पूत्र व‎ महापौरपदाच्या शर्यतीत असलेले‎ नगरसेवक डॉ. किरण देशमुख ‎यांनीही बैठकीकडे पाठ फिरवली ‎होती.‎ घराणेशाहीचेही समर्थन… चांगला कार्यकर्ता असेल न्याय द्यावा लागेल घराणेशाहीच्या प्रश्नावर पालकमंत्री गोरे म्हणाले, ‘एखाद्या नेत्याचा नातेवाईक असला आणि तो चांगला कार्यकर्ता असेल, पक्षासाठी चांगले काम करत असेल तर त्याचे योगदान विसरून चालणार नाही. पण, डायरेक्ट अशा काही गोष्टी असल्यास ते पक्षाच्या शिस्तीत बसणारे नाही. आम्ही शक्यतो कार्यकर्त्यास न्याय देण्याचा प्रयत्न करतो’, अशी पुष्टीही गोरे यांनी जोडली. जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपमधील घराणेशाही अशी… ‘आयाराम गयाराम’ शब्द 1967 पासून राजकीय चर्चेत, तो असंविधानिक नव्हे हरियाणातील गयालाल नामक एका आमदाराने 1967 मध्ये एकाच दिवसात तीन पक्ष बदलले होते. आधी ते काँग्रेसमधून राष्ट्रीय आघाडी पक्षात गेले. काही वेळात परत काँग्रेसमध्ये आले आणि नऊ तासांत पुन्हा राष्ट्रीय आघाडीत गेले. जेव्हा ते आघाडीतून काँग्रेसमध्ये आले होते तेव्हा काँग्रेसचे नेते राव वीरेंद्रसिंग हे गयालाल यांना पत्रकारांसमोर घेऊन आले आणि त्यांनी जाहीर केले की, ‘गयाराम आता आयाराम’ झाले आहेत. तेव्हापासून पक्षांतर करणाऱ्यांसाठी हा शब्द रुढ झाला आहे. मात्र हा शब्द असंविधानिक मानला जात नाही. गोरेंनी मोकळा केला कोंड्याल यांच्या महापौरपदाचा मार्ग मनपा निवडणुकीपूर्वी आमदार देवेंद्र कोठे व पालकमंत्री गोरे यांनी अनेक दिग्गज नेत्यांना भाजपात आणले. त्यापैकी 42 जणांना उमेदवारी दिली. 35 जण निवडून आले. या विजयी उमेदवारांमध्ये बहुतांश जण हे कोठे समर्थक आहेत. यापैकी एक विनायक कोंड्याल हे आमदार कोठे यांचे भाऊजी आहेत. चार वेळा नगरसेवक झाल्याने व यंदा सर्वाधिक लीडने निवडून आल्यामुळे महापौरपदासाठी त्यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र आयात नेत्यांना महापौर करायचे की निष्ठावंतांना? असा मतप्रवाह भाजपच्या प्रदेश पातळीपासून ते स्थानिक कार्यकर्त्यांपर्यंत चर्चेत आहे. कोठे यांचा कोंड्याल यांच्यासाठी आग्रह आहे. तर संघ परिवार व निष्ठावंतांकडून नरेंद्र काळे यांचे नाव पुढे केले जात आहे. मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष निष्ठावंतांनाच न्याय देतील? अशी कार्यकर्त्यांना आशा आहे. मात्र पालकमंत्री गोरे यांनी आता कोंड्याल यांच्यावरील ‘आयाराम’चा शिक्का पुसून महापौरपदासाठी त्यांच्या पदरात आपले वजन टाकले आहे, असा राजकीय अर्थ काढला जात आहे.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!