अर्थखाते मिळत नसल्याने सुनेत्रा पवार नाराज:राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या बैठकीत व्यक्त केली खंत; मुंबईत असूनही प्रफुल्ल पटेलांची गैरहजरी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांच्या निधनानंतर अवघ्या तीन दिवसांत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विराजमान झालेल्या सुनेत्रा पवार यांनी 13 दिवसांनी प्रत्यक्ष पदभार स्वीकारला असला तरी, महायुती सरकारमध्ये आता राष्ट्रवादीला जाणीवपूर्वक डावलले जात असल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे. याच नाराजीतून त्यांनी आज देवगिरी बंगल्यावर झालेल्या पक्षाच्या बैठकीत अर्थखाते राष्ट्रवादीला दिले जात नसल्याची उघड खंत व्यक्त केली असल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी-माजी आमदारांची पार पडलेल्या महत्त्वाच्या बैठकीत पक्षाची पुढील वाटचाल आणि आगामी विधान परिषद निवडणुकांवर सविस्तर चर्चा झाली, मात्र याच बैठकीत पक्षाध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी राज्याचे अर्थखाते राष्ट्रवादीला मिळत नसल्याबद्दल उघडपणे खंत व्यक्त केली. अजित पवार हयात असताना अर्थखाते त्यांच्याकडेच असल्याने त्याच न्यायाने हे खाते आताही राष्ट्रवादीलाच मिळावे अशी पक्षाची रास्त अपेक्षा होती. मात्र, वारंवार मागणी करूनही भाजपकडून अर्थखाते दिले जात नसल्याने सुनेत्रा पवार यांनी या बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे समजते. पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठकीला प्रफुल्ल पटेल गैरहजर तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत नाराजी वाढत असल्याचे चित्र आता स्पष्ट होऊ लागले आहे. पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार या मायलेकांनी घेतलेल्या काही निर्णयांवरून पक्षातील वरिष्ठ नेत्यांची फळी आधीपासूनच नाराज असल्याची चर्चा सुरू होती. त्यात आजच्या बैठकीत पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल गैरहजर राहिले होते. बैठकीतच गोंधळाची परिस्थिती आजच्या या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून असतानाच, पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हे मुंबईत असूनही या बैठकीला गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. पटेल यांच्या गैरहजेरीमुळे आश्चर्य व्यक्त केले जात असतानाच, प्रत्यक्ष बैठकीतही मोठा गोंधळ उडाल्याचे वृत्त समोर आले आहे. बैठकीदरम्यान ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला होता, ज्यावरून तटकरे आणि छगन भुजबळ या दोन ज्येष्ठ नेत्यांमध्ये भर बैठकीतच जोरदार खडाजंगी झाली. या सर्व घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या सर्व काही आलबेल नसल्याचेच दिसून येत आहे. पटेल आणि मी, आम्ही दोघेच टीकेचे धनी का?- सुनील तटकरे या बैठकीत बोलताना ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांनी तीव्र शब्दांत खंत व्यक्त केली की, आपल्यावर आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांवर, तसेच पक्षावर टीका होत असताना पक्षातील इतर कोणताही नेता किंवा स्वतः नेतृत्व आमच्या समर्थनासाठी पुढे येत नाही. अजितदादांच्या निधनानंतर आम्ही दोघेच पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असताना आम्हीच टीकेचे धनी का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या या मुद्द्यावर छगन भुजबळ यांनी मात्र आक्षेप घेतला आणि जे झाले ते झाले, ते सोडून द्या व आता पुढे जाऊया, असा सल्ला तटकरेंना दिला. याच मुद्द्यावरून या दोन नेत्यांमध्ये भर बैठकीत खडाजंगी झाल्याचे म्हटले जात आहे. विशेष बाब म्हणजे, तटकरे यांचे भाषण सुरू होण्यापूर्वीच पार्थ पवार यांनी बैठकीतून काढता पाय घेतल्याचीही माहिती समोर आली आहे. कोणताही वाद झालेला नाही- छगन भुजबळ छगन भुजबळ यांनी बैठकीनंतर सांगितले की, कोणताही वाद झालेला नाही. आमच्या राष्ट्रवादीची बैठक सुरू होती तेव्हा आम्हाला समितीच्या बैठकीसाठी देखील फोन येत होते. काहीतरी कारण असेल. काही खडाजंगी अजिबात झालेली नाही, आम्हाला या बैठकीसाठी सारखे फोन येत होते. त्यामुळे मी मुद्द्याचे पटकन बोला असे म्हणालो, कुठलाही वाद झाला नाही. कुठलाही एकला चलोचा नारा कोणीही दिलेला नाही. कुठेही फुटलेले नाही आमची शक्ती तशीच आहे. सगळ्या आमदारांना सांगितले की आम्ही सगळे एक आहोत, अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष असलेल्या प्रफुल्ल पटेल यांच्या पदाबाबत सध्या पक्षात संभ्रमाची स्थिती असून, देवगिरी बंगल्यावर पार पडलेल्या पक्षाच्या या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीला ते गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात मोठे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पक्षात ज्येष्ठ नेत्यांना डावलले जात असल्याची भावना अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा कारभार सुरू झाला असला तरी, पक्षात ज्येष्ठ नेत्यांना जाणीवपूर्वक डावलले जात असल्याची तीव्र भावना दुसऱ्या फळीतील नेत्यांमध्ये निर्माण झाली आहे. या सर्व अंतर्गत घडामोडींमुळे राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये मोठी चलबिचल सुरू असून, याच अस्वस्थतेतून मध्यंतरी सुनील तटकरे यांच्यासह काही आमदारांनी थेट शरद पवार यांची भेट घेतल्याने पक्षात सध्या एकंदर गोंधळाचे आणि अस्थिरतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!