उद्धव-राज युती म्हणजे एक ‘लव्हस्टोरी’!:’ठाकरे बंधू’ एकत्र येण्यासाठी कुणी घेतला पुढाकार? संजय राऊतांनी सांगितली ‘इनसाईड स्टोरी’

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे अनेक दावे केले आहेत. एका विशेष मुलाखतीत बोलताना त्यांनी ठाकरे बंधूंच्या (राज आणि उद्धव) युतीचे गुपित उघड केलेच, शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे भवितव्य अंधारात असल्याचे भाकीत वर्तवले आहे. “पुढच्या निवडणुकीपर्यंत शिंदेंकडे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण राहणार नाही, त्यांच्या पक्षाचे शटर लवकरच डाऊन होईल,” असे घाणाघाती विधान राऊत यांनी केले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून ज्या भेटीची प्रतीक्षा होती, ती ‘ठाकरे बंधूंची युती’ नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने प्रत्यक्षात उतरली. मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षांनी एकत्रित ७१ जागा जिंकून महायुतीला तगडे आव्हान दिले. या ऐतिहासिक युतीची समीकरणे नेमकी कशी जुळली? यामागचा ‘सुत्रधार’ कोण? या सर्व प्रश्नांवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ‘एबीपी माझा’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सविस्तर आणि भावनिक भाष्य केले आहे. ठाकरे बंधूंच्या युतीची ‘लव्हस्टोरी’ ठाकरे बंधुंची युती घडवून आणण्यामागे आपला हात असल्याचा दावा संजय राऊत यांनी फेटाळून लावला. ते म्हणाले, “मी त्यांना एकत्र आणलं असं म्हणणं चुकीचं ठरेल, कारण ठाकरे कोणाचंच ऐकत नाहीत. माझे दोघांशीही प्रेमाचे आणि आपुलकीचे संबंध आहेत. ती एका अर्थाने ‘लव्हस्टोरी’ आहे. जसा प्रेमात थोडा वेळ लागतो, तसंच या युतीचं झालं. दोघांच्याही मनात कौटुंबिक ओढ होती आणि शेवटी ती जुळली.” युतीची सुरुवात नेमकी कुठून झाली? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील दुरावा संपण्यासाठी राज ठाकरेंनी घेतलेला पुढाकार महत्त्वाचा ठरल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. एका मुलाखतीत राज ठाकरेंनी “महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी मी दोन पावले मागे यायला तयार आहे,” असे विधान राज ठाकरे यांनी केले होते. या विधानानंतर उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झाली. मराठी माणसाला एकत्र पाहण्याची जनतेची इच्छा असल्याने हे चांगले संकेत असल्याचे मानून चर्चेची चक्रे फिरली. “आधी मराठी माणूस, मग हिंदुत्व,” या विचारावर दोन्ही भावांचे एकमत झाले. मराठीपण टिकले तरच हिंदुत्व टिकेल, या भावनेतून डिसेंबर महिन्यात युतीवर अधिकृत शिक्कामोर्तब झाले. मराठी माणसाला एकत्र व्हायला पाहिजे, असे वाटत असताना आम्ही एकत्र आलो नाही, तर जनता आम्हाला माफ करणार नाही, याची जाणीव दोघांनाही होती. त्यामुळेच आज हे चित्र दिसत आहे, असे संजय राऊत म्हणाले. शिंदेंचा सत्तेचा अमरपट्टा लवकरच संपणार शिंदे गटावर टीका करताना संजय राऊत यांनी अत्यंत गंभीर दावे केले. त्यांच्या मते, सर्वोच्च न्यायालयाच्या आगामी निकालानंतर निवडणूक आयोग ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठवेल. भारतीय संविधानातील १० व्या सूचीनुसार हे चिन्ह शिंदेंकडे राहू शकत नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राऊत पुढे म्हणाले, “एकनाथ शिंदे यांनी सरन्यायाधीशांना कितीही पुष्पगुच्छ दिले तरी त्याचा फायदा होणार नाही. अमित शाह यांनी त्यांना चालवायला दिलेल्या कंपनीचे शटर लवकरच डाऊन होईल. अशी स्थिती येईल की शिंदेंना आपला गट शेवटी भाजपमध्ये विलीन करावा लागेल. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही आलेले नाही आणि २०२९ च्या निवडणुकीपूर्वी त्यांच्याकडे पक्ष उरणार नाही, हे मी खात्रीने सांगतो.” सुनावणी लांबणीवर पडण्यामागचे गौडबंगाल सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी वारंवार पुढे ढकलली जात असल्यावरही राऊत यांनी संशय व्यक्त केला. “सुनावणीबाबत वारंवार तारखा दिल्या जात आहेत कारण त्यांना निकालाची भीती आहे. पण अखेर संविधानानुसारच निर्णय लागेल आणि शिंदे गटाला आपली ओळख गमवावी लागेल,” असे राऊत यांनी निक्षून सांगितले. ठाकरे बंधूंच्या युतीमुळे मराठी माणसाचे राजकारण बळकट झाले असून, भविष्यात हा ‘ठाकरे ब्रँड’ महाराष्ट्राचे राजकारण ठरवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Leave a Comment

error: Content is protected !!