हिरव्या, भगव्या रंगाचा स्वार्थासाठी वापर:काँग्रेसचे मुंब्रा वादावर भाष्य; हिरवा सुबत्तेचा, भगवा त्यागाचा रंग म्हणत तिरंगा घरोघरी पोहोचवण्याचे आवाहन

तिरंगा ही देशाची आन, बान व शान आहे. तिरंग्यासाठी आपल्या अनेक लोकांनी रक्त सांडले आहे. आज काही जातीयवादी व धर्मांध शक्ती स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी हिरव्या व भगव्या रंगाचे राजकारण करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम करत आहेत. पण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यातील घराघरात मनामनात तिरंगा पोहोचवला पाहिजे, असे प्रतिपादन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज केले. 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते मुंबई स्थित राज्य काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या टिळक भवनात ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, सरचिटमीस प्रफुल्ल गुडदे पाटील, प्रदेश उपाध्यक्ष राजेश शर्मा, प्रदेश सरचिटणीस जोजो थॉमस, झिशान अहमद, श्रुती म्हात्रे आदी नेते उपस्थित होते. एमआयएमच्या मुंब्रा येथील नगरसेविका सहर शेख यांनी संपूर्ण मुंब्रा हिरवा करण्याची घोषणा केली. त्यावर भाजपने आक्षेप घेत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. या प्रकरणी दोन्ही पक्षांत राजकीय कलगीतुरा रंगला असताना हर्षवर्धन सपकाळ यांनी उपरोक्त आवाहन केले. तिरंगा एक विचार, एक स्वप्न हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, स्वातंत्र्याचा लढा व स्वातंत्र्यानंतर देश उभारणीत काँग्रेस पक्षाचा सिंहाचा वाटा आहे. ही एक मोठी साधना आहे. या साधनेला संघर्षाची जोड आहे. संघर्षाचा हा मुलमंत्र आपण जपला पाहिजे. आज देशात काही शक्ती जातीपातीचे, धर्माचे राजकारण करत आहेत. कुणाला हिरव्या रंगाचे, तर कुणाला भगव्या रंगाचे राजकारण करायचे आहे. हिरवा व भगवा या रंगाचा आदर आहेच. कारण, हिरवा रंग हा सुबत्तेचा, तर भगवा रंग हा त्यागाचे व सन्मानाचे प्रतिक आहे. तिरंगा हा एक विचार आहे. स्वप्न आहे. त्यासाठी आम्ही आजही रक्त सांडण्यास तयार आहोत. भाजप व एमआयएम या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळापासून त्यांचे एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहेत. मोहम्मद अली जिना यांच्या पक्षासोबत जनसंघाने निवडणुका लढवल्या. त्यांच्यासोबत सरकार स्थापन केले. त्या सरकारमध्ये जनसंघाचे श्यामाप्रसाद मुखर्जी उपमुख्यमंत्री होते. आज त्याचे पुनरुज्जीवन केले जात आहे, असे ते म्हणाले. मनामनात, घराघरात तिरंगा पोहोचवा तिरंगा हा आपल्या देशाची आन, बान व शान आहे. तिरंग्यासाठी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी आपले बलिदान दिले आहे. पण सध्या काही जातीयवादी व धर्मांध शक्ती आपल्या स्वार्थी राजकारणासाठी हिरव्या व भगव्या रंगाचे राजकारण करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम करत आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांनी व संविधानवादी लोकांनी मात्र भारतासह संपूर्ण महाराष्ट्रात मनामनात, घराघरात तिरंगा पोहोचवण्याचा निर्धार करावा, असेही सपकाळ यावेळी बोलताना म्हणाले.

Leave a Comment

error: Content is protected !!