मंत्री गिरीश महाजनांनी बाबासाहेबांचे नाव घेणे टाळले:महिला पोलिस अधिकाऱ्याने जागेवरच विचारला जाब; नाशकात काय घडले? वाचा

राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नामोल्लेख टाळला. यामुळे संतप्त झालेल्या एका महिला पोलिस अधिकाऱ्यांना महाजनांना जागेवरच जाब विचारला. यामुळे नाशिक येथील शासकीय ध्वजारोहणावेळी एकच वाद झाला. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून, त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आज 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. भारताने 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान अंगीकृत केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या संविधानाचे शिल्पकार मानले जातात. त्यामुळे साहजिकच प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात त्याचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. पण गिरीश महाजन यांनी आपल्या संपूर्ण भाषणात एकदाही बाबासाहेबांचे नाव घेतले नाही. ते विसरले की त्यांनी ते जाणिवपूर्वक टाळले हे स्पष्ट झाले नाही. पण एका महिला पोलिस अधिकाऱ्याने या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला. थेट पालकमंत्र्यांनाच विचारला जाब माधवी जाधव असे या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. त्या सध्या वन विभागात कार्यरत आहेत. त्यांनी या प्रकरणी थेट मंत्री महाजनांना बाबासाहेबांचे नाव का घेतले नाही? असा जाब विचारला. या अनपेक्षित प्रकारामुळे महाजन चांगलेच भांबावले. त्यानंतर पोलिसांनी माधवी जाधव यांना ताब्यात घेऊन त्यांचे बोलणे बंद करण्याचा प्रयत्न केला. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी खूप मोठी चूक केली आहे. मला निलंबित केले तरी चालेल, पण मी त्यांना जाब विचारल्याप्रकरणी माफी मागणार नाही. काय म्हणाल्या माधवी जाधव? वादावादीनंतर पत्रकारांपुढे आपली बाजू मांडताना माधवी जाधव म्हणाल्या, गिरीश महाजनांनी आपल्या भाषणात कुठेही बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतले नाही. जी व्यक्ती संविधानाला कारणीभूत आहे. त्याला तुम्ही संपवायला निघालात? पालकमंत्र्यांची ही फार मोठी चूक आहे. मी माफी मागणार नाही. पालकमंत्र्यांनी ही चूक पदरात घ्यावी. मला मीडियाशी देणेघेणे नाही. मी वाळूच्या गाड्या उतरेन, माती काम करेन. पण मी बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही. मला निलंबित करायचे असेल तर करू शकता. पण बाबासाहेबांना संपवायचे काम मी करू देणार नाही. मी 15 ऑगस्ट, 26 जानेवारी या तारखांना मानत नाही. पण लोकशाही मानते, असे त्या म्हणाल्या. संविधानाशी संबंध नसलेल्यांचे वारंवार नाव घेतले यावेळी अन्य एक महिला पोलिस अधिकारी माधवी जाधव यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यावेळी माधवी त्यांना म्हणाल्या, मॅडम तुम्ही देखील संविधानामुळे आहात. पालकमंत्रीही संविधानामुळे आहेत. बाबासाहेबांचे नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल याची मी वाट पाहत होते. पण बाबासाहेबांचे नाव एकदाही भाषणात आले नाही. लोकशाही व संविधानाला कारणीभूत नसलेल्या लोकांची नावे वारंवार घेण्यात आली. मग संविधानाचा व प्रजासत्ताक दिनाचा जो खरा मानकरी आहे, त्याचे नाव भाषणात का आले नाही? असा सवालही त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला.

Leave a Comment

error: Content is protected !!