नवीन रस्त्यावर दीड ते साडेतीन फुटांचे खड्डे; अपघातांना खुले आमंत्रण
सुरेश पाचभाई / मारेगाव
मारेगाव तालुक्यातील कुंभा ते खैरी (करणवाडी–खैरी) या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याचे काम नुकतेच पूर्ण झाले असताना अवघ्या काही दिवसांतच या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय बनली आहे. रस्ता आहे की खड्ड्यांची माळ, असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करीत आहेत.

कुंभा व महादापेठ या दोन गावांदरम्यान असलेल्या पुलावर तर अक्षरशः दीड ते साडेतीन फुट खोल खड्डे पडले असून या मार्गावरून अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहे.ये-जा करणाऱ्या दुचाकी, चारचाकी व एसटी बससाठी हा रस्ता जीवघेणा ठरत आहे. एखादा क्षण चुकला तरी वाहन पलटी होण्याची किंवा मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हा रस्ता शाळकरी विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार व प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र अशा धोकादायक परिस्थितीतून दररोज प्रवास करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोठी दुर्घटना होण्यापूर्वी प्रशासन जागे होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
सदर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग, मारेगाव यांच्या अखत्यारीत येतो. इतक्या अल्पावधीत रस्ता पूर्णपणे उखडून खड्डेमय होणे, यामुळे कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही ठोस कारवाई किंवा दुरुस्तीचे संकेत दिसून आलेले नाहीत.
परिसरातील नागरिक, पालक व वाहनधारकांनी तात्काळ रस्ता दुरुस्ती करून सुरक्षित वाहतूक सुरू करण्याची जोरदार मागणी केली आहे. जर एखादी अनुचित घटना घडली, तर त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित विभाग व यंत्रणेवर राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
प्रशासनाने वेळेत दखल घेतली नाही, तर नागरिकांचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता तरी सार्वजनिक बांधकाम विभाग जागा होणार की एखाद्या दुर्घटनेची वाट पाहणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
