महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या विमानाला आज सकाळी बारामती विमानतळावर लँडिंग करताना भीषण अपघात झाला. विमान शेतात कोसळल्याने त्याला आग लागली आणि 5 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये अजित पवार, त्यांचे सुरक्षारक्षक, पीए आणि वैमानिकांचा समावेश आहे. अजित पवार आज सकाळी मुंबईहून खासगी विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. सकाळी 9 च्या सुमारास बारामती विमानतळावर लँडिंगचा प्रयत्न करत असताना वैमानिकाचे विमानावरचे नियंत्रण सुटले. विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी शेजारी असलेल्या एका शेतात जोराने आदळले आणि आग लागली. तातडीने बचावकार्य सुरू अपघाताची कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (DGCA) अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. अपघाताची बातमी समजताच राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि इतर राजकीय नेत्यांनी अपघातावर शोक व्यक्त केला आहे. अपघातस्थळी तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. अग्निशमन दल आणि पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. मात्र, अपघात इतका भीषण होता की, त्यातून कोणालाही वाचवण्याची संधीच मिळाली नाही. दुर्घटनेचा थरारक घटनाक्रम बारामती परिसरात आज सकाळी घडलेल्या विमान दुर्घटनेबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीतून धक्कादायक तपशील समोर येत आहेत. अनेक नागरिकांनी सांगितले की संबंधित विमान काही वेळ आकाशात घिरट्या घालत असल्याचे दिसत होते. लँडिंगच्या आधी विमानाचा वेग कमी झाला होता, मात्र अचानक ते जोरात खाली येताना दिसले. साधारण 100 फूट अंतरावर असताना विमान जमिनीवर आदळले आणि क्षणातच त्याला आग लागली, असे एका स्थानिक व्यक्तीने सांगितले. अपघात होताच मोठा आवाज झाला आणि परिसरात एकच गोंधळ उडाला. एका महिलेने सांगितले की, आम्ही आवाज ऐकून त्या दिशेने धावलो, पण तोपर्यंत विमानाचा चक्काचूर झाला होता. दरम्यान, शेजारच्या शेतात काम करत असलेल्या एका महिलेनेही थरारक अनुभव कथन केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, विमान प्रथम वरून गेले, पुन्हा वळून आले आणि हळूहळू खाली येऊ लागले. प्रत्येक फेरीत ते अधिकच खाली येत असल्याचे दिसत होते. महिलेने सांगितले की विमान धावपट्टीच्या दिशेने झुकलेले दिसत असतानाच अचानक मोठा स्फोट झाला. स्फोटानंतर विमानाचे अनेक तुकडे हवेत उडाले आणि जळत्या अवस्थेत ते फिरताना दिसले. स्फोट इतका भीषण होता की आमच्या घराजवळही विमानाचे अवशेष पडले, असेही त्यांनी सांगितले. स्फोटानंतर घटनास्थळावर धुराचे मोठे लोट उठत होते आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. प्रत्यक्षदर्शींच्या या कथनामुळे अपघाताची तीव्रता आणि अचानकपणा स्पष्ट होत असून, संपूर्ण परिसर हादरून गेला असल्याचे चित्र दिसून येत आहे. असा आवाज या आधी कधीही आलेला नाही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, विमान खाली येत असताना त्यातून खूप मोठ्या प्रमाणात आवाज येत होता. विमान या ठिकाणी नेहमीच लँड करते. मात्र असा आवाज कधीही आलेला नाही. अगदी जमिनीच्या जवळ आल्यानंतर विमान अचानक तिरपे झाले. आणि ते जवळच्या शेतामध्ये कोसळले. विमान कोसळल्यानंतर एका मागे एक असे तीन ते चार स्फोट झाले. अपघात एवढा भीषण होता की, प्रत्यक्षदर्शी जवळ जाईपर्यंत सर्व प्रवाशांचा जळून मृत्यू झाला होता. नेमका अपघात कुठे आणि कसा झाला? उपलब्ध माहितीनुसार, अजित पवार हे आज सकाळी मुंबईहून खासगी विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. सकाळी सुमारे 8:40 ते 8:45 च्या दरम्यान बारामती विमानतळावर विमान लँडिंग करण्याचा प्रयत्न करत असताना अचानक वैमानिकाचे विमानावरील नियंत्रण सुटल्याचा दावा करण्यात येतो. तांत्रिक बिघाडामुळे विमान नियोजित धावपट्टीवर उतरण्याऐवजी विमानतळालगत असलेल्या एका शेतात जोरात आदळले, अशी माहिती पुढे आली आहे. विमान जमिनीवर आदळताच काही सेकंदांतच त्याला भीषण आग लागली. आगीचे लोळ उठू लागल्याने संपूर्ण विमान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आणि जळून खाक झाले, असे सांगितले जाते. अपघातानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट उठले, ज्यामुळे आसपासच्या गावांमध्ये आणि विमानतळ परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलिस, अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्याचे दावे करण्यात येत आहेत.
