टीम इंडियाच्या विजयाच्या जल्लोषाला महाराष्ट्रात गालबोट:अकोल्यात दगडफेक, पुण्यात हुल्लडबाजी; तर सांगलीत फटाक्यांमुळे आग

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय संघाने न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करत आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ वर आपले नाव कोरले. या ऐतिहासिक विजयाने संपूर्ण देश आनंदाने न्हाऊन निघाला असून महाराष्ट्रातही ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष करण्यात आला. मात्र, दुर्दैवाने या आनंदाच्या वातावरणाला राज्यातील काही शहरांमध्ये गालबोट लागले आहे. सांगली, पुणे, अकोला आणि अमरावतीमध्ये हुल्लडबाजी आणि वादाच्या घटनांमुळे तणाव निर्माण झाला होता. अकोल्यातील हरिहरपेठ भागात परिस्थिती सर्वाधिक तणावपूर्ण होती. फटाके फोडण्यावरून दोन गटांत झालेल्या वादाचे रूपांतर दगडफेकीत झाले. सोनटक्के प्लॉट आणि गाडगेनगर भागात दोन गट आमनेसामने आल्याने खळबळ उडाली. या दगडफेकीत चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली असून, यात काही नागरिक आणि पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून, दोषींची ओळख पटवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांनी ‘कोंबिंग ऑपरेशन’ सुरू केले आहे. मिरजेत पोलिसांचा लाठीमार; तर सांगलीत अनर्थ टळला सांगलीच्या मिरज येथील लक्ष्मी मार्केट परिसरात विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी जमलेल्या हजारो तरुणांच्या गर्दीने हुल्लडबाजीला सुरुवात केली. पोलिसांनी वारंवार सूचना देऊनही गर्दी नियंत्रणात येत नसल्याने अखेर पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. दुसरीकडे, सांगली शहराच्या मारुती चौकात फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मोठी दुर्घटना घडता घडता वाचली. फटाक्यांची ठिणगी दुकानाच्या छतावरील पालापाचोळ्यावर पडल्याने आग लागली. मात्र, वेळीच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आणि मोठी वित्तहानी टळली. पुणे आणि अमरावतीत ‘बेफाम’ जल्लोष पुण्यातील प्रसिद्ध फर्ग्युसन रोड (FC रोड) वर तरुणांनी नियमांना पायदळी तुडवत हुल्लडबाजी केली. अलोट गर्दीमुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला होता, परिणामी पोलिसांना बळाचा वापर करून गर्दी पांगवावी लागली. तर अमरावतीतील राजकमल चौकात तरुणांनी एकमेकांच्या अंगावर थेट फटाके फेकत जीवघेणा जल्लोष केला. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत मोठा बंदोबस्त तैनात करून परिस्थिती हाताळली. धुळे आणि भंडाऱ्यात उत्साह कायम एकीकडे राज्यात काही ठिकाणी टीम इंडियाच्या विजयोत्सवाला गालबोट लागले असताना, इतर भागात उत्साहाचे वातावरण होते. धुळे शहरात तरुणांनी ढोल-ताशांच्या गजरावर आणि डीजेच्या तालावर ठेका धरला. तर भंडाऱ्यातील मुस्लिम लायब्ररी चौकात क्रिकेट प्रेमींनी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करत भारतीय संघाच्या विजयाचा आनंद साजरा केला.

Leave a Comment

error: Content is protected !!