मोहोळ तालुक्यात मान्सूनच्या संथ गतीमुळे बळीराजाच्या चिंतेत कमालीची भर पडली आहे. चालू जून महिन्याचे पहिले २१ दिवस पूर्णपणे पावसाविना कोरडे गेले असून, संपूर्ण खरीप हंगामच धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. दरवर्षी जूनच्या मध्यापर्यंत शेतांमध्ये पेरणीची लगबग अंतिम टप्प्यात असायची, मात्र यंदा पावसाने दगा दिल्यामुळे ७३.३ हेक्टरवरील शेतजमीन अद्याप ओस पडली आहे. कडक ऊन आणि वाहणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे ग्रामीण जीवन होरपळून निघाले असून, खरीप पिकांची पेरणी सुरू करणे शेतकऱ्यांना अवघड झाले आहे. पापरी परिसरातील शेतकऱ्यांनी उन्हाळ्यामध्येच जमिनीची कुळवणी, नांगरणी, सपाटीकरण यांसह शेतीच्या मशागतीची सर्व पूर्वतयारी पूर्ण करून ठेवली होती. मात्र मृग नक्षत्र संपत आले तरीही वरुणराजाने पाठ फिरवल्याने आता शेतकरी हताश होऊन आशेने आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. सर्वांचे लक्ष आता हवामान खात्याच्या अंदाजाकडे लागले असून वाढत्या उष्णतेमुळे या भागातील भूजल पातळी कमालीची खालावली आहे. विहिरी आणि कूपनलिका कोरड्या पडू लागल्याने पिकांना देण्यासाठी पुरेसे पाणी कमी पडत आहे. परिणामी मान्सून लवकर सक्रिय व्हावा आणि शेतांमध्ये पुन्हा हिरवळ परतावी या एकमेव आशेवर शेतकरी हवामानाच्या प्रत्येक अंदाजावर बारीक लक्ष ठेवून आहेत. रोहिणी, मृग नक्षत्र पहिल्यांदाच कोरडे गेले आहे. आता आद्रा नक्षत्रात पाऊस झाल्यास पेरणीच्या आशा शेतकऱ्यांतून लागल्या आहेत. पापरी भागात अद्यापही समाधानकारक पावसाचा पत्ता नसल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. मान्सूनच्या आगमनाची तारीख वारंवार पुढे ढकलली जात असल्याने खरीप हंगामाची संपूर्ण गणिते विस्कळीत झाली आहेत. यंदा उन्हाळ्याची तीव्रता अधिक काळ टिकून राहिल्याने जमिनीतील ओलावा पूर्णतः नष्ट झाला आहे. मृग नक्षत्रात चांगल्या पावसाच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी नांगरणी, रोटरणी, सरी-वरंबे यासह पूर्वमशागतीची सर्व कामे पूर्ण केली. मात्र मान्सूनने पुन्हा दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मोहोळ तालुक्यात मागील एक दोन रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ होत चालली आहे. एकरी शेतीचा खर्च कमालीचा वाढल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे. खरीप हंगामासाठी तयारी करताना अनेक शेतकऱ्यांनी जवळचे सोनं तारण ठेवून, मित्र परिवार, नातलग यांकडून हातउसने कर्ज काढले आहे मात्र यावेळी अल निनोच्या संकटाने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. डाळींब पेरू बागांचे अनेकांनी बहार धरले असून त्याची फळे बटाट्याच्या आकाराची झाली आहेत बागांना पावसाच्या पाण्याची गरज आहे. गुलाब झेंडू, गुलछडी आदी फुल पिकांनाही वाढत्या तापमानाचा फटका बसत असून गुलछडी तोड्यात फुले कमी निघू लागली आहेत गुलाब फुले आकाराने लहान व कांडीलाच करपू लागली आहेत. ऊस पिकही पिवळे होवून सुकू लागले आहे. ^”रोहिणी मृग नक्षत्र कोरडी गेली, पेरण्या खोळंबल्या आहेत, पावसाने पाठ फिरवल्याने शेतातील विहरी कूपनलिका यांची पाणीपातळी घट होत चालली आहे. बहार धरलेल्या डाळींब फळबागेस पाण्याची गरज आहे. आता आद्रा नक्षत्र सुरू झालेय त्यावरच सगळी भिस्त आहे ते कोरडे गेले तर पुढील दिवस खूप भयानक जातील. एका जोरदार पावसाची गरज आहे.” – अनिल टेकळे (डाळींब उत्पादक), पापरी दोन वर्षांत कुठे मुसळधार अतिवृष्टी, गारपीठ अवकाळी पाऊस, उष्णतेची लाट यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे पिकांचे व फळबागांचे मोठे नुकसान झाले. अनेकवेळा निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करूनही शेतपिकांना भाव नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली. परिणामी उत्पादन खर्च ही निघेना झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिति बिकट होत चालली आहे. आता नुकतेच आद्रा नक्षत्र निघाले असून येणाऱ्या काही दिवसांत पाऊस झाल्यास खरीपाची पेरणी होईल अशी आशा आहे मात्र पुढे पिकांची उगवण क्षमता, रोपांची जोरदार वाढ यावर परिणाम होण्याची भीतीही शेतकरी व्यक्त करत आहेत. पावसाअभावी ग्रामीण अर्थचक्रावर परिणाम होत असून वाढते तापमान, ढगाळ वातावरणाचा अभाव, हवामानातील अनिश्चितता यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा आता आद्रा नक्षत्राकडे लागल्या आहेत. आगामी काही दिवसांत चांगला पाऊस झाल्यास खरीप हंगामाला गती मिळेल अशी आशा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. फळबागांसह फुलपिकांना फटका; ऊस लागला सुकू पेरण्या खोळंबल्या
