भल्या पहाटे उठून रात्री उशिरापर्यंत जनसामान्यांच्या कामात स्वतःला वाहून घेणारे अजित पवार आज बारामतीच्या मातीत चिरनिद्रेत विसावले. त्यांच्या पार्थिवावर आज बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात शासकीय इतमामात अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थ व जय पवार या त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांना मुखाग्नी दिला. यावेळी ‘अजित पवार अमर रहे’, ‘अजितदादा परत’, ‘एकच वादा अजितदादा’ या अशा विविध घोषणांनी आसमंत दणाणून गेला होता. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी एका विमान अपघातात अकाली निधन झाले. ते मुंबईहून बारामती येथे प्रचारासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी येत होते. पण धावपट्टीपासून अवघ्या काही मीटर अंतरावर त्यांचे विमान कोसळले आणि महाराष्ट्राचा एक कर्तबगार राजकारणी जागेवरच काळाच्या पडद्याआड गेला. अजित पवारांसह 5 जणांचे या दुर्दैवी अपघातात निधन झाले. त्यानंतर आज सकाळी अजित पवारांचे पार्थीव प्रथम काटेवाडी या त्यांच्या मूळगावी नेण्यात आले. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार तेथून ते बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात आले. तिथे असंख्य भावभावनांच्या हिंदोळ्यांवर अत्यंत शोकाकूल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थ व जय पवार या त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी हजारोंच्या जनसमुदायाने अजित पवार अमर रहेचा जयघोष करत आपल्या लाडक्या दादांना भावपूर्ण निरोप दिला. यावेळी काटेवाडीपासून विद्या प्रतिष्ठानपर्यंत महिलांसह कार्यकर्त्यांनी केलेला आक्रोश अजितदादांवरील अखंड प्रेमाची साक्ष देत होता. अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात एक चबुतरा उभारण्यात आला होता. या चबुतऱ्यावर पवार कुटुंबीयांसह राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. त्याच्या शेजारील मंडपात शरद पवार, सुनेत्रा पवार यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप अध्यक्ष नितीन नबीन, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, मंत्री छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, शाहू महाराज छत्रपती, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक लहानथोर नेते उपस्थित होते. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत अविरत काम उल्लेखनीय बाब म्हणजे अजित पवार राज्याच्या राजकीय वर्तुळात कामाचा माणूस म्हणून परिचित होते. ते भल्या पहाटे उठून आपल्या कामाला सुरुवात करायचे. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत जनतेच्या समस्या सोडवत राहायचे. राज्यातील जनता त्यांच्याकडे केवळ एका नेता म्हणून नव्हे तर आपला आधार, आपला दादा म्हणून काम पाहत होते. राज्याच्या राजकारणात मागील साडेचार दशकांपासून त्यांनी आपला शब्द ‘खरा’ करून दाखवला. त्यामुळे त्यांच्या अंत्यसंस्काराला आज आबालवृद्धांपासून महिलांपर्यंत हजारोंचा जनसमुदाय जमला होता.
