Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

अहमदाबादसह बारामती विमान दुर्घटनेत 11 नंबर केंद्रस्थानी:टेबलटॉप रनवेवर आव्हानात्मक लँडिंग; थरकाप उडवणारी कहाणी

बारामतीत झालेल्या भीषण विमान अपघातानं संपूर्ण देश हादरून गेला आहे. या अपघातात 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राज्याच्या राजकारणातील अत्यंत प्रभावी नेतृत्व अजित पवार यांचंही निधन झालं. या घटनेनं महाराष्ट्राच्या काळजाचा ठोका चुकवला आहे. आपल्या लाडक्या ‘दादा’चं अपघाती निधन झाल्याचं वृत्त समजताच अवघा महाराष्ट्र हळहळला. बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात शासकीय सन्मानात अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारोंच्या संख्येनं जमलेले नागरिक, कार्यकर्ते आणि नेत्यांच्या डोळ्यांत अश्रू होते. हा अपघात केवळ एक दुर्घटना न राहता, अनेक आठवणी आणि प्रश्न मागे ठेवून गेला आहे. अजित पवारांचा दुर्दैवी अपघात देशाला काही महिन्यांपूर्वी घडलेल्या अहमदाबादच्या भीषण विमान दुर्घटनेची आठवण करून देणारा ठरला. विशेष म्हणजे दोन्ही अपघातांमध्ये ‘11 नंबर’ हा केंद्रस्थानी आला. अहमदाबादच्या अपघातात सीट क्रमांक 11A वर बसलेला एक प्रवासी चमत्कारिकरित्या बचावला आणि तो क्रमांक जीवनदायी ठरला. मात्र, बारामतीत अजित पवारांचं विमान ज्या रनवे क्रमांक 11 वर उतरणार होतं, तोच क्रमांक दुर्दैवी ठरला. सात महिन्यांच्या कालावधीत देशात घडलेले हे दोन मोठे विमान अपघात नागरिकांना हादरवणारे ठरले आहेत. 12 जून 2025 रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात 241 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. अहमदाबादहून लंडनकडे झेपावलेलं विमान उड्डाणानंतर काही सेकंदांतच कोसळलं. लाखो लिटर इंधन भरलेलं असल्यामुळे विमान आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं आणि संपूर्ण परिसर ज्वाळांनी वेढला गेला. या दुर्घटनेत फक्त एकच प्रवासी बचावला, जो सीट क्रमांक 11A वर बसला होता. हा योगायोग अनेकांसाठी चमत्कार ठरला. मात्र, बारामतीतील अपघातात हाच ‘11’ क्रमांक मृत्यूचा साक्षीदार ठरला. अजित पवारांना घेऊन जाणारं विमान बुधवारी सकाळी मुंबईहून उड्डाण करून बारामतीकडे निघालं होतं. हे विमान खडकाळ भूभागावर उंच बांधलेल्या टेबलटॉप रनवेवर उतरणार होतं. बारामती विमानतळावरील धावपट्टी क्रमांक 11 ही उंचावरची असून, अशा प्रकारच्या रनवेवर लँडिंग करणं अत्यंत आव्हानात्मक आणि धोकादायक मानलं जातं. आजवर देशात घडलेल्या अनेक अपघातांमध्ये टेबलटॉप रनवे हा महत्त्वाचा घटक ठरलेला आहे. या रनवेच्या कडेला खोल दरी आणि खड्डे असल्यामुळे थोडीशी चूकही जीवघेणी ठरू शकते. अपघाताच्या आधीच्या काही मिनिटांची माहिती पाहिली तर अनेक गंभीर बाबी समोर येतात. अजित पवारांचं विमान सकाळी 8.10 वाजता मुंबईहून उड्डाण झालं. पुणे एटीसीशी संपर्क साधल्यानंतर विमान बारामती एटीसीच्या संपर्कात आलं. रनवे दिसतोय का? याबाबत पायलट आणि एटीसीमध्ये चर्चा झाली. परिस्थिती सुरक्षित नसल्याचं लक्षात येताच एटीसीने पायलट सुमित कपूर यांना ‘गो-अराउंड’ म्हणजेच एक फेरी मारून पुन्हा लँडिंगचा प्रयत्न करण्याचा सल्ला दिला. हा निर्णय सुरक्षित लँडिंगसाठी घेण्यात आला होता. पायलटनं तो मान्य करत विमान पुन्हा हवेत वळवलं. दुसऱ्या प्रयत्नात सकाळी सुमारे 8.45 वाजता विमान लँड होणार होतं. विमान धावपट्टीच्या अगदी जवळ पोहोचलंही. मात्र, लँडिंगच्या काही सेकंद आधीच रनवे क्रमांक 11 च्या बाजूला असलेल्या भागात विमान कोसळलं. टेबलटॉप रनवेपासून अवघ्या 50 मीटर अंतरावर असलेल्या खड्ड्यात विमान आदळलं. शेवटच्या तीन मिनिटांत नेमकं काय घडलं, याचा तपास सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये विमान उतरत असतानाच प्रचंड स्फोट झाल्याचं स्पष्टपणे दिसून येतं. आकाशात ज्वाळा उसळताना आणि धुराचे लोट पसरताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. VSR वेंचर्स लिमिटेडच्या Learjet 45 विमानाचं लँडिंगच्या काही क्षण आधी नियंत्रण बिघडलं आणि भीषण अपघात झाला. धडकेनंतर विमानाचे तीन तुकडे झाले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं की, आम्ही लगेच धाव घेतली, पण आगीच्या ज्वाळा इतक्या प्रचंड होत्या की जवळ जाणंही अशक्य होतं. काही मिनिटांतच संपूर्ण विमान राखेत बदललं. या दुर्घटनेत अजित पवारांसह विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी काळाच्या पडद्याआड गेले. हा अपघात केवळ एक तांत्रिक घटना न राहता, महाराष्ट्राच्या राजकारणात आणि जनमानसात मोठी पोकळी निर्माण करणारा ठरला आहे.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!