अजितदादा गेले, यावर अजूनही विश्वास बसत नाही. असं म्हणतात की मोठ्या झाडाच्या सावलीत दुसरं झाड वाढत नाही. पण दादांनी आपल्या परिश्रमातून राजकीय जीवनात स्वतःचा वेगळा वटवृक्ष उभा केला—आणि अनेक नेत्यांना घडवलं, वाढवलं, अशा शब्दांत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर आज दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी या प्रकरणी एका पोस्टद्वारे आपली भावना व्यक्त केली आहे. ते म्हणाले, अजितदादा गेले, अजूनही विश्वास बसत नाही. दादांचे व्यक्तिमत्व कुठल्याही ठोकताळ्यात बसणारे नव्हते. त्यांनी मराठी माणसाच्या जीवनात खोलवर शिरकाव केला होता—आणि त्यांच्या जाण्याने निर्माण झालेल्या अचानक रितेपणातून ते प्रकर्षाने जाणवत आहे. त्यांना तुम्ही कधी भेटला जरी नसाल तरी ते तुमच्यासाठी परिचित होते हेच ते वेगळेपण! तुम्ही त्यांच्या समर्थनात असाल किंवा विरोधात; पण त्यांना दुर्लक्षित करणं कधीच शक्य नव्हतं. माझ्याबद्दल त्यांच्या मनात नेमकं काय होतं, हे मी ठामपणे सांगू शकत नाही – कदाचित कौतुकमिश्रित आत्मीयता असावी. काही वर्षांपूर्वी मी प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आणि अचानक माझा फोन खणखणला. दादांचा आवाज होता – “काय झालं असं अचानक?” मी कारण सांगितलं. ते लगेच म्हणाले, “मी काही करू शकतो का? मला तुमचं काम आवडतं.” दुसऱ्यांदा विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भेटले. मी सहज विचारलं, “दादा, पाच मिनिटं बोलू शकतो का?” तर त्यांनी हात धरला आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या दालनात थेट घेऊन गेले. शेवटी आत्मीयतेने विचारलेला एक प्रश्न—तो आजही मनात घर करून आहे. महाविकास आघाडी सरकार असताना काही भूमिका मांडायची असेल, तर “आवर्जून मला सांगा,” असं ते खास सांगायचे. दादा माणूस रोखठोक—आडपडदा नाही. २००८–०९ चा काळ असेल. काँग्रेस–राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं सरकार होतं. विधानपरिषदेची निवडणूक होती. एक राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मला विमानतळावर भेटले. सहज बोलून गेलो, “काँग्रेसला मदत करा.” त्या आमदाराने मात्र स्वतःचे गुण वाढवण्यासाठी दादांकडे तक्रार केली. दुपारी थेट दादांचा फोन आला— “हे पहा, आपल्या दोन्ही पक्षांत ठरलं आहे. मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झाली आहे. आपापले आमदार सांभाळायचे मग…” मला अक्षरशः दम भरला. त्या वेळी दादांची माझ्याशी फारशी ओळखही नव्हती, आणि विधानपरिषद निवडणूक प्रक्रियेशी माझा काडीचाही संबंध नव्हता. त्या आमदाराचा राग आला; पण दादा आपली जबाबदारी किती गांभीर्याने घेतात, हे त्या प्रसंगातून स्पष्ट झालं. भाजपला आरोप मागे करून सच्ची श्रद्धांजली वाहण्याचा सल्ला सचिन सावंत म्हणाले, मी दादांवर टीकाही केली, कधी चिमटेही काढले—पण त्यांनी कधी मनात ठेवलं नाही. कामाचा अफाट उरक, प्रशासनावर मजबूत पकड असणारे दादा माध्यमांमधील किंवा भाषणांमधील वक्तव्यांत कधी कधी ढिलाई का दाखवायचे, हा प्रश्न मला अनेकदा पडायचा. त्यांच्या राजकारणाबद्दल किंवा राजकीय प्रवासाबद्दल कोणाचं मत काहीही असो; पण जनतेशी असलेला थेट कनेक्ट, दिलेल्या शब्दांचा सन्मान, कार्यकर्त्यांशी असलेली नाळ, निरंतर जनसेवा आणि दिलदारपणा—या गुणांनी त्यांची लोकनेता म्हणून ओळख निर्माण झाली, यात शंका नाही. सत्तर हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या भाजपाने त्यांच्याबरोबरच सत्ता स्थापन केली, तरीही आरोप मात्र तसेच ठेवले. सिद्ध न झालेला आरोप जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत तसाच राहिला—ही अजित पवारांच्या जीवनाची शोकांतिका आहे. ईडी–सीबीआयचा कुटुंबावर झालेला ससेमिरा आणि आरोपांच्या फैरी संपूर्ण देशाने पाहिल्या. नुकत्याच झालेल्या निवडणूक प्रचारात दादांनी याबाबत खंत व्यक्त केली होती. भाजपाने आपले हे आरोप चुकीचे होते, हे आतातरी मान्य करावे – हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली ठरेल. असं म्हणतात की मोठ्या झाडाच्या सावलीत दुसरं झाड वाढत नाही. पण दादांनी आपल्या परिश्रमातून राजकीय जीवनात स्वतःचा वेगळा वटवृक्ष उभा केला—आणि अनेक नेत्यांना घडवलं, वाढवलं. दादा गेले… पण आपल्या व्यक्तिमत्वाचा आणि कर्तृत्वाचा अमिट ठसा कायम मागे ठेवून. भावपूर्ण श्रद्धांजली, असे सचिन सावंत यांनी आपल्या पोस्टद्वारे म्हटले आहे. उल्लेखीय बाब म्हणजे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी विमान अपघातात अकाली निधन झाले. बारामती येथील प्रचारसभेला जाणाऱ्या अजित पवारांच्या विमानाला विमानतळापासून अवघ्या 50 मीटर अंतरावरच अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, त्यातून प्रवास करणाऱ्या अजित पवारांसह सर्वांचाच जागेवर मृत्यू झाला. त्यामुळे अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकला. आज त्यांच्या पार्थिवावर बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या अंत्यसंस्काराला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह देशभरातील अनेक छोटेमोठे नेते उपस्थित होते.
